महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेवर आशिष शेलारांची टीका


मुंबई : महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला पत्रकार परिषदेत घेऊन उत्तर देण्यात आले. ही पत्रकार परिषद महाविकास आघाडी सरकारच्या वतीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतली. यानंतर महाविकास आघाडी सरकारला भाजप नेत्यांकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. दरम्यान भाजप आमदार आशिष शेलार यांनी आघाडीची ‘तीन माणसं’ बोलली कि रडली..? असा टोला लगावला आहे. एकामागोमाग एक असे एकूण आठ ट्विट करत आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.


महाराष्ट्राला काय मिळेल आणि कसे मिळेल हे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले त्यावर एवढी का कळ पोटात गेली? एका माणसाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला ‘आघाडीची तीन माणसं’ धावली. घाबरताय कशाला? तुमचं अपयश, नाकर्तेपणा उघड होतो त्याला? एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण! करुन दाखवा, रडून नको!,’ असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.


‘तीन माणसांच्या’ दाव्यांचा महाराष्ट्रात सर्व आलबेल असल्याचे, आभासी चित्र निर्माण करणाऱ्या आघाडीचा’ पर्दाफाश पत्रकारांनी त्याच जागी केला. मुंबईतील अपयश पत्रकारांच्या पहिल्या प्रश्नातच उघडे झाले आणि ‘तीन माणसं’ एकमेकाकडे बघत बसले! आभासी फुगा जागीच फोडणाऱ्या पत्रकारांचे आभार. आघाडीची ‘तीन माणसं’ बोलली कि रडली..? कोरोना आल्यापासून हे असेच रोज रडणे सुरु आहे. कधी केंद्राच्या नावाने रडायचे.. अधी विरोधी पक्षाच्या नावाने.. आता थांबवा ही तुमची रडगाणी.. आता करुन दाखवा ना! तुम्ही मदत द्या.. शेतकऱ्यांना पँकेज द्या.. कोरोनापासुन महाराष्ट्राला वाचवा! रडू नका,’ असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.


पण आज तथाकथित अर्थतज्ज्ञ जयंत पाटील हे विपर्यास करुन-करुन रडले. पण किती रडणार? खोटे किती बोलणार? अर्थतज्ज्ञ म्हणवता मग महाराष्ट्रात अर्थक्रांती घडवा ना..कुणी रोखलंय तुम्हाला..उगाच पावटे खाल्या सारखे का वागताय? दुर्गंधी का सोडताय? ‘त्यांना’जमत नसेल ‘तुम्ही’ करुन दाखवा,’ असे आव्हानच आशिष शेलार यांनी दिले आहे.


‘महाराष्ट्र द्रोही तर तुम्ही आहात. तुमची निष्क्रियता महाराष्ट्राचे नुकसान करतेय. महाराष्ट्राला मागे घेऊन जातेय. तुमच्या निष्क्रियतेने गिफ्ट सिटी महाराष्ट्राने गमावली. सांगली ऐवजी अफ्रिकेत ऊस पिकवणे हा महाराष्ट्र द्रोह नव्हे काय? आता उद्योग महाराष्ट्रात येऊ नयेच असे का वागताय?,’ अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली आहे.


‘गेली २० वर्षे सत्ता असणाऱ्या, सुमारे ३३ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मृतदेहाच्या बाजूला रुग्णांना उपचार देत आहात. अनिल परबजी हा आभास नाही सत्य! आभासी रडू नका,या सत्यावर बोला! मुंबईकर तुम्हाला विचारतोय काय करुन दाखवलंत? त्याचं उत्तर द्या!


‘आघाडीची तीन माणसं’ बोलली.. पण मुख्यमंत्री कुठे आहेत? उपमुख्यमंत्री कुठे आहेत? मुंबईचे पालकमंत्री कुठे आहेत? मदतीचे पँकेज कुठे आहे? निष्पाप माणसं मरत आहेत.. खाटा नाहीत, डॉक्टर नाहीत, रुग्णवाहिका नाहीत. त्याचे काय ते सांगा.. सामान्य माणसाचे हालहाल करताय त्यावर बोला,’ असंही आशिष शेलार यांनी म्हटले आहे.


काँग्रेस आघाडीच्या पत्रकार परिषदेत असून नसल्यासारखे वाटले. बहुतेक पक्षाचे प्रमुख राहुल गांधी यांची सुचना तंतोतंत पाळली. पळकुटी भूमिका आज पण दिसली. काँग्रेस पळून दाखवतेय. किमान बाकीच्यांनी रडून नको करून दाखवा, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

Leave a Comment