नवी दिल्ली : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा सूर रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांनी देखील आवळत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच कोरोना नियंत्रण करण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.
राणेंच्या पावलावर पाऊल; आठवलेंनी देखील आवळला राष्ट्रपती राजवटीचा सूर
रामदास आठवले म्हणाले, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 54 हजारांचा पार पोहचल्यामुळे महाराष्ट्रासह मुंबईदेखील कोरोनामय झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची या कोरोनाचा सामना करण्याची जबाबदारी होती. पण कोरोनाचा सामना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्यामुळे सर्वाधिक 1 हजार कोरोना मृत्यू मुंबईत झाले आहेत. महाराष्ट्रात अशास्थितीत राष्ट्रपती राजवट आली, तरी भाजपचे सरकार येईल, असे मला वाटत नाही. कारण भाजपला सत्ता स्थापनेसाठी आघाडीतील तीनपैकी एका पक्षाचा पाठिंबा लागणार आहे. तरच महायुतीचे सरकार येईल. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीमुळे महायुतीचे सरकार येईल असे नाही. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता कोरोना नियंत्रणात महाविकास आघाडी अपयशी ठरल्यामुळे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.