देशातील शाळा, कॉलेज तसेच शैक्षणिक संस्था सुरु करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही


नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरु आहे. त्याचबरोबर मार्च महिन्याच्या अखेरीपासून देशातील शाळा, कॉलेज तसेच शैक्षणिक संस्था बंद आहेत. पण आता देशभरातील पालकांसमोर मुलांच्या शाळा आणि कॉलेज केव्हापासून सुरु होणार असा प्रश्न उभा राहिला होता. त्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देशभरातील शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था सुरु करण्याबाबत अद्याप कोणतीही परवानगी अथवा निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. काही प्रसारमाध्यम्यांनी सर्व राज्यांना शाळा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे वृत्त दिल्यामुळे आणि ते वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून असा याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


यासंबंधी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून ट्विट करण्यात आले आहे. असा कोणताही निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाकडून घेण्यात आलेला नाही. देशभरातील सर्व शैक्षणिक संस्थांवर अद्यापही निर्बंध कायम असल्याची माहिती ट्विटरवरुन देण्यात आली आहे.

देशभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यापासूनच सर्वच शाळा, कॉलेज बंद आहेत. सर्व पालकांना दोन महिन्यांपासून शाळा बंद असल्याने शाळा पुन्हा कधी सुरु होणार हा प्रश्न सतावत आहे. सोबतच लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा असणार आहे. २४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला होता. यानंतर ३ मे आणि १७ मे रोजी लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यात आली. सध्या लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.

Leave a Comment