ठाकरे सरकारच्या अस्थिरतेबाबतच्या निव्वळ अफवा – संजय राऊत


मुंबई : कोरोना व्हायरसचा राज्याभोवतीचा फार्स अधिक घट्ट होत चालला आहे. त्याचबरोबर वारंवार वाढणाऱ्या लॉकडाऊनमुळे राज्यातील नागरिक चिंतेत असतानाच राज्यातील सरकारमध्ये काही तरी वेगळीच खलबते चालली असल्याचे चित्र सध्या आहे. या चर्चेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटमुळे पुष्टी देखील मिळाली आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये सरकार मजबूत आहे. चिंता नसावी, स्थिरतेबाबतच्या अफवा निव्वळ पोटदुखी असल्याचे म्हटले आहे. कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. काल राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवटीची मागणी कोरोनाच्या या काळात अनेक दिवस माध्यमांपासून दूर असलेल्या खासदार नारायण राणे यांनी केल्याने या चर्चेला ऊत आला आहे.


काल संध्याकाळी मातोश्रीवर शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली. सुमारे दीड तास दोन नेत्यात चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी ‘कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है. विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे हेच बरे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील. बुमरॅंग…’ असे म्हटले आहे.

Leave a Comment