जितेंद्र आव्हाड यांची रेल्वेमंत्र्यांवर टीका; रेल्वेपेक्षा ट्विटच जास्त सोडले


मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे रेल्वे मंत्रालयाकडून स्थलांतरित मजूर, कामगारांना परराज्यांमधील मूळ गावी पाठविण्यासाठी विशेष रेल्वेगाडय़ा कमी उपलब्ध होत असल्याची तक्रार केली होती. दरम्यान, अनेकदा ट्विटरच्या माध्यमातून पियूष गोयल यांनी राज्य सरकारवर निशाला साधला होता. त्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही पियूष गोयल यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. रेल्वेपेक्षा रेल्वेमंत्र्यांनी ट्विट जास्त सोडले आहेत, अशा शब्दात पियूष गोयल यांना टोला लगावला आहे. भाजपच्या नेत्यांकडून जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेले नाही.


कोरोनाने देशभरात हाहाकार माजवला आहे. केंद्र सरकारने अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउनची घोषणा केली आहे. सर्व उद्योगधंदेही लॉकाउनच्या कालावधीत ठप्प आहे. त्यातच रेल्वे सेवा बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी कामगार पायीच आपापल्या मूळ गावी जाताना दिसत आहे. याच दरम्यान रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी विशेष ट्रेनची घोषणा केल्यानंतर विशेष रेल्वेगाड्या महाराष्ट्रात कमी उपलब्ध होत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे केली होती. त्यानंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारपासून हव्या तेवढ्या रेल्वेगाड्या देतो, असे ट्विटरवरून जाहीर करून चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलावला होता. तसेच त्यांनी राज्याकडे प्रवाशांची यादी देण्याचीही मागणी केली होती. त्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटला पीयूष गोयल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच यावर काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment