मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी हव्या तितक्या ट्रेन्स केंद्र सरकारकडून मिळत नसल्याचे बोलून दाखवल्यानंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी त्यावर आक्रमक भूमिका घेत, रोज 125 ट्रेन महाराष्ट्रासाठी सोडण्यासाठी रेल्वे तयार आहे. यानंतर रात्री सव्वा बारा वाजता रेल्वेमंत्र्यांनी एक ट्विट करत अडकलेल्या मजुरांची यादी अद्याप मिळाली नसून लवकरात लवकर यादी पाठवावी, असे म्हटल्यानंतर रात्री सव्वा दोन वाजता ट्विट करुन 125 गाड्यांची तयारी केली असताना आम्हाला फक्त 46 ट्रेन्सची यादी मिळाली असून त्यापैकी 41 ट्रेन सोडाव्या लागणार आहेत. कारण उर्वरित पाच ट्रेन पश्चिम बंगाल आणि ओदिशाला जाणाऱ्या असून त्या अम्फान चक्रीवादळामुळे चालवू शकत नसल्याचे पियुष गोयल म्हणाले.
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रात्री सव्वा बारा वाजता महाराष्ट्र सरकारने अजूनही यादी दिली नसल्याचे ट्विट केले होते. ज्यात त्यांनी रात्रीचे 12 वाजले आहेत आणि पाच तासांनंतरही आमच्याकडे अद्याप महाराष्ट्र सरकारकडून उद्याच्या 125 ट्रेन्सची माहिती आणि प्रवाशांची यादी आलेली नाही. तरीही प्रतीक्षा करा आणि तयारी सुरु ठेवा, असा आदेश मी अधिकाऱ्यांना दिल्याचे त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारला माझी सूचना आहे की, पुढच्या एक तासात किती ट्रेन, कुठेपर्यंत आणि प्रवाशांची यादी आम्हाला पाठवावी. आम्ही प्रतीक्षा करत आहोत आणि पूर्ण रात्र काम करुन उद्याच्या गाड्यांची तयारी करु. कृपया प्रवाशांची यादी पुढच्या एक तासात पाठवा, असे ट्विटमध्ये म्हटले.
Where is the list for 125 trains from Maharashtra? As of 2am, received list of only 46 trains of which 5 are to West Bengal and Odisha which cannot operate due to cyclone Amphan.
We are notifying only 41 trains for today despite being prepared for 125 !!!
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 24, 2020
यानंतर रेल्वेमंत्र्यांनी पुन्हा दोन तासांनी म्हणजेच रात्री सव्वा दोन वाजता आणखी एक ट्विट केले आणि लिहिले की, महाराष्ट्रातून सुटणाऱ्या 125 गाड्यांसाठी मजुरांची यादी कुठे आहे? फक्त 46 ट्रेन्सची यादी दोन वाजेपर्यंत मिळाली असून त्यापैकी पाच पश्चिम बंगाल आणि ओदिशाला जाणाऱ्या आहेत, परंतु अम्फान वादळामुळे त्या चालवल्या जाणार नाहीत. आम्ही 125 गाड्यांची तयारी केली असताना फक्त 41 ट्रेन सोडाव्या लागणार आहेत.
दरम्यान काँग्रेस नेते सचिन सांवत यांनी पियुष गोयल यांनी तासाभरात मागितलेल्या यादीच्या ट्विटवर टीका केली आहे. ते म्हणाले की, हे असे मंत्री आहेत, जे मध्येच गायब असतात आणि अचानक प्रकट होतात. आश्चर्य या गोष्टीचे आहे की, मागील 25 दिवसांपासून मजुरांच्या तिकिटाचे ८५ टक्के भाडे माफ करण्याचा आपल्या विभागाचा आदेश जनतेलाच नाही तर उच्च न्यायालयाही सांगू शकले नाहीत आणि काही तासात यांना यादी हवी आहे.
यह ऐसे मंत्री हे जो बीच में गायब रहते हैं। अचानक प्रकट होते हैं।
आश्चर्य इस बात का है कि गये २५ दिनों से यह अपने विभाग का श्रमिकों के लिए ८५% रेल किराया माफ करने का आदेश जनता को ही नहीं पर उच्चतम न्यायालय को भी बता न पाए। और कुछ घंटों में इनको सूची चाहिए। https://t.co/4vDkZWpYVi— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 24, 2020
रेल्वेमंत्र्यांनी ट्रेन आणि मजुरांची यादी मागितली असली तरी एका तासात ती पुरवणे व्यवहार्य नाही. कारण लॉकडाऊनमुळे सरकारी कामकाज अद्याप पूर्ण कर्मचाऱ्यांसह सुरु नाही. त्यात रेल्वेमंत्र्यांनी रात्री ट्विट करुन मजुरांची यादी मागितली, यावेळी सरकारी कार्यालयंही बंद झालेली असतात. दरम्यान, रेल्वमंत्र्यांनी मागितलेली ट्रेन्स आणि मजुरांची यादी हे सोशल मीडियावर सुरु असलेल्या लॉकडाऊनमधल्या एखाद्या चॅलेंजप्रमाणे असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
मुख्यमंत्री राज्याला उद्देशून साधलेल्या संवादात परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी हव्या तितक्या ट्रेन्स केंद्र सरकारकडून मिळत नसल्याचे म्हणाले होते. आतापर्यंत 7 ते 8 लाख मजूरांना घरी पाठवले, यासाठी कुठले पॅकेज द्यायचे? असा सवाल करत पोकळ घोषणा करणारे महाविकास आघाडीचं सरकार नाही. राज्यभरात गोरगरीब, मजूरांसह लाखो लोकांना मदत केली आहे. त्याची जाहिरात करायची का? आम्ही रोज 80 ट्रेनची मागणी केंद्राकडे केली आहे. मजुरांना घरी पाठवण्याची व्यवस्था करत आहोत. त्यांचा खर्च आम्ही करत आहोत. पण केंद्राकडून हव्या तितक्या ट्रेन उपलब्ध होत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.
उम्मीद है कि पहले की तरह ट्रेन स्टेशन पर आने के बाद, वापिस ख़ाली ना जानी पड़े। आपको आश्वस्त करना चाहूँगा की आपको जितनी ट्रेन चाहिए वो उपलब्ध होंगी।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 24, 2020
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आक्रमक भूमिका घेत, महाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्यासाठी रेल्वे तयार आहे. रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांची यादी द्या, असे पियुष गोयल यांनी ट्विट करुन म्हटले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये उद्धवजी आशा आहे तुम्ही ठीक असाल. तुमच्या स्वास्थ्यासाठी शुभेच्छा. महाराष्ट्राला उद्यापासून रोज 125 श्रमिक स्पेशल ट्रेन देण्याची रेल्वेची तयारी आहे. महाराष्ट्रातील मजुरांची यादी तुमच्याकडे असल्याचे तुम्ही सांगितले. ती यादी तुम्ही कृपया रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे एका तासाच्या आत सादर करावी. यासोबतच ट्रेन कुठून सोडायची आहे, प्रवाशांनुसार ट्रेनची संख्या, त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ही सर्व माहितीही द्यावी. यानुसार ट्रेन सोडण्याचे नियोजन आम्हाला करता येईल, असे पियुष गोयल म्हणाले. आशा आहे, ट्रेन स्टेशनवर आल्यावर आधीसारख्या रिकाम्या जाणार नाहीत. तुम्हाला जितक्या ट्रेन हव्या आहेत तेवढ्या उपलब्ध करून दिल्या जातील.