गर्दीमुळे सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडाल्यास पुन्हा सगळे बंद करावे लागेल


मुंबई – देशासह राज्यात सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु असून ३१ तारखेपर्यंत लॉकडाउनचा हा चौथा टप्पा असणार आहे. पण ३१ तारखेनंतर पुढे काय? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल. कारण लॉकडाऊनमुळे देशासह राज्यातील प्रत्येक व्यक्ती कंटाळली आहे. पण लॉकडाऊन एकाच क्षणात शिथिल करणे हे खूप जोखमीचे काम आहे आणि म्हणूनच आम्ही टप्प्याने राज्यात सगळे सुरु करत आहोत. पण हे सर्व करताना गर्दीमुळे जर सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडाला तर नाईलाजास्तव आम्हाला पुन्हा सगळे बंद करावे लागेल असा इशारा आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना दिला आहे.

दुकाने, उद्योगधंदे, व्यवसाय सगळे काही सुरु होईल. पण त्यासाठी नियमांच्या अधीन राहिले पाहिजे आणि नियमांची हेळसांड होणार असेल तर सगळे बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नसल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. देशाचे चित्र पुढच्या १५ दिवसात स्पष्ट होईल, कारण मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्याचे सोनिया गांधी यांच्यासह झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये मी सांगितले. महाराष्ट्रात सध्या ५० हजार उद्योग सुरु झाले आहेत. सहा लाख कामगार हे कामावर रुजू झाले आहेत. लॉकडाउन एकदम करणे हे जसे चुकीचे आहे तसेच लॉकडाउन एकदम उठवणेही चुकीचे ठरेल. आपण हळूहळू सगळ्या गोष्टी सुरु करत आहोत. पण हे सगळ करत असताना स्वयंशिस्त पाळली जाणे अत्यंत गरजेचे आहे. जर शिस्त दिसली नाही, गर्दी झाली तर मात्र सगळ काही पुन्हा बंद करावे लागेल.

आम्ही राज्यातील अर्थचक्र कसे चालणार यावरही लक्ष केंद्रीत केले आहे. बांधावरच शेतकऱ्यांना बी-बियाणे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच ७५ ते ८० टक्के कापूस खरेदीचाही विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्याचा काळ हा राजकारण करण्याचा काळ नाही. सध्या कोरोना नावाच्या संकटाशी आपण लढा देत आहोत. राजकारण तुम्ही सुरु केले असले तरीही आम्ही सुरु केलेले नाही. राज्यावरचे संकट टाळले जाणे सध्याच्या घडीला जास्त महत्त्वाचे असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Comment