मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या रक्षणसाठी सज्ज झालेल्या कोरोना वॉरिअर्सचे मानले आभार


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोरोना वॉरिअर्सचे आभार मानले असून आपल्याला हे युद्ध शस्त्राने नाही तर सेवेने जिंकायचे असल्याचे आवाहन त्यांनी प्रत्येक कोरोना वॉरिअर्सला उद्देशून लिहिलेल्या पत्रात केले आहे

कोरोना वॉरिअर्सला उद्देशून लिहिलेल्या आपल्या पत्रात मुख्यमंत्री पुढे म्हणतात की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांना वैयक्तिक स्वरूपात पत्र लिहिताना माझी छाती अभिमानाने फुलून गेली आहे. आपल्या महाराष्ट्राची आणि मराठी मातीची हीच महान परंपरा आहे. तो संकटकाळात मागे हटत नाही. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याप्रमाणे कणखर होतो. आपण सगळेच आज कोरोनाच्या भीषण संकटाशी युद्ध करत आहोत. हे युद्ध साधे नाही. या युद्ध संकटात एक “सैनिक” बनून आपण कोरोना वॉरिअर्स म्हणून मैदानात उतरला आहात. राज्याच्या रक्षणासाठी माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण सज्ज झाला आहात, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

सीमेवरील सैनिकांप्रमाणेच हे युद्ध सुद्धा लढावे लागेल. आज महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक जणू एक सैनिक बनूनच संकटाचा मुकाबला करताना दिसत आहे. आता आपल्यासारखे कोरोना वॉरिअर्स युद्धात उतरल्याने मला मुख्यमंत्री म्हणून मोठे बळ मिळाले आहे. ही एक प्रकारे देश आणि देवपुजाच आहे. हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. ही मोहीम आपल्याला शस्त्रापेक्षा सेवेने जिंकायची आहे. थोडक्यात सेवा हेच आपले शस्त्र राहील. हा महाराष्ट्र, महाराष्ट्रातील जनता आपल्या रक्ताची आणि नात्याचीच आहे. महाराष्ट्राच्या हाकेला प्रतिसाद देत आपण पराक्रमाच्या परंपरेस जपत आहात. आपले आभार कसे मानवेत? ही सेवा महाराष्ट्राच्या व शिवरायांच्या चरणी रूजू झाल्याशिवाय राहणार नाही.

विविध क्षेत्रातून मुंबईसह राज्यभरातून परिचारिका, फार्मासिस्ट, डॉक्टर, सामान्य स्वंयसेवक, सामाजिक कार्यकर्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, पॅरामेडिक, इतर वैद्यकीय व्यावसायिक, माहिती तंत्रज्ञानक्षेत्र, शिक्षक, संरक्षण सेवा, सुरक्षा रक्षक, सैन्य वैद्यकीय संस्थेतील २१ हजार ७५२ लोकांनी “कोरोना वॉरिअर्स” होण्यासाठी अर्ज केले आहेत. यात वैद्यकीय क्षेत्रातील योद्ध्यांची संख्या १२ हजार १०३, तर इतर क्षेत्रातील ९ हजार ६४९ आहे. यातील ३ हजार ७१६ कोविड कोरोना वॉरिअर्सनी रेड झोनमध्ये काम करण्याची तयारी दर्शविली आहे.

राज्यात कोरोना वॉरिअर्ससाठी प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये ३७६६ अर्ज मुंबईसाठी असून यात वैद्यकीय क्षेत्रातील अर्जांची संख्या १७८५ आहे तर इतर क्षेत्रासाठी १९८१ अर्ज आले आहेत. ज्या जम्बो सुविधा मुंबईमध्ये उपचारासाठी निर्माण करण्यात येत आहेत त्यात काम करण्यासाठी तयारी दर्शविलेल्या सर्व कोरोना वॉरिअर्सना बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नियुक्तीपत्र देण्याची कार्यवाही सध्या सुरु आहे. कोरोना वॉरिअर्स म्हणून काम करण्याची तयारी दर्शविलेल्या सर्व कोरोना वॉरिअर्सना सलाम करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना व्यक्तिशः पत्र लिहुन आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Comment