देशात कोरोनाबाधितांच्या आकड्यात सर्वात मोठी वाढ, रुग्णसंख्या १,१८,४४७ वर


नवी दिल्ली – देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत होत असलेली वाढ अद्यापही कायम असून मागील २४ तासात देशात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ झाली आहे. देशात मागील २४ तासात ६०८८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून त्याचबरोबर देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख १८ हजार ४४७ वर पोहोचली आहे. दरम्यान देशात काल दिवसभरात १४८ मृत्यूंची नोंद झाली असून देशात आतापर्यंत या रोगाने ३५८३ जणांचा बळी घेतला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ४८ हजार ५३३ जणांनी या रोगावर यशस्वीरित्या मात करुन घरी पोहचले आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण ४०.९७ टक्के आहे.

देशात गेल्या दोन दिवसांपासून रोज पाच हजारांहून अधिक रुग्णांची भर पडत असून काल २४ तासांत ५,६०९ नवे रुग्ण आढळले होते. देशात महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसलेला असून महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ४१ हजारावर पोहोचली आहे. महाराष्ट्रानंतर तामिळनाडू (१३,९६७), गुजरात (१२,९०५) यांचा क्रमांक आहे. दिल्लीमध्य कोरोनाचे ११ हजार ६५९ रुग्ण आहेत. राजस्थानमध्ये कोरोनाचे ६२७७ रुग्ण असून यामधील ३४८५ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर १५१ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात ५९८१ कोरोना रुग्ण असून २४८३ रुग्ण बरे झाले असून २७० जणांचा मृत्यू झाला आहे.

३० जानेवारी रोजी देशात पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर ४५ दिवसांनी म्हणजे १५ मार्च रोजी भारतातील कोरोनाबाधितांची संख्या १०० वर पोहोचली. तर भारताने एक हजाराचा टप्पा अधिक वेगाने म्हणजे २९ मार्च रोजी गाठला तर १३ एप्रिलपर्यंत बाधितांची संख्या १० हजारांवर गेली. ६ मे रोजी बाधितांची संख्या ५० हजारांवर पोहोचली तर बाधितांची संख्या एक लाखावर पोहोचण्यासाठी दोन आठवडय़ांहून कमी कालावधी लागला. जागतिक पातळीवर बाधितांची संख्या ५० लाखांवर पोहोचली आहे तर तर ३.३ लाख जणांचा मृत्यू झाला आहे आणि १९ लाखांहून अधिक जण बरे झाले आहेत.

Leave a Comment