सोनिया गांधींच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उपस्थिती


नवी दिल्ली : देशावर ओढावलेल्या कोरोना महामारीला तात्काळ राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, त्याचबरोबर हे संकट झेलण्यासाठी देशभरातील राज्यांना तातडीने मदत करा अशी मागणी देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्रितपणे केली आहे. विरोधी पक्षांची कोरोनाच्या संकटकाळात पहिल्यांदाच एकत्रित बैठक आज पार पडली. देशातील 22 पक्षांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या बैठकीत सहभाग घेतला. त्यातही शिवसेनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची उपस्थिती सर्वात लक्षणीय होती.

शिवसेनेची काँग्रेसच्या बैठकीत उपस्थिती हा प्रकार राजकीय इतिहासात यानिमित्ताने पहिल्यांदाच घडला. शिवसेना काँग्रेस महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत एकत्रित आल्यानंतर शिवसेना आता राष्ट्रीय पातळीवर एनडीएकडून यूपीएकडे प्रवास करत आहे का ? असा प्रश्न नागरिकांच्या तसेच राजकारण्यांच्या मनात घोळतो आहे. समाजवादी पक्ष, बसपा, आम आदमी पक्ष यांनी मात्र या बैठकीला पाठ फिरवली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या बैठकीत आपल्या भाषणात मोदी सरकारच्या लॉकडाऊनबद्दलच्या धोरणांबद्दल कडाडून हल्ला चढवला.

या संकटाच्या काळात काँग्रेससह अनेक समविचारी पक्षांनी गरिबांना आधार देण्यासाठी थेट मदतीची मागणी केली, पण त्याकडे सरकारने कानाडोळा केला. त्याचबरोबर मजुरांचे हाल होऊ नयेत यासाठी बसेस, रेल्वेला परवानगी देण्याची मागणी विरोधक सातत्याने करत होते. पण त्याहीबाबत सरकारने निर्णय वेळेवर न घेतल्यामुळे मजुरांचे प्रचंड हाल झाल्याचे सोनिया गांधींनी म्हटले.

केवळ कोरोनामुळे अर्थव्यवस्थेची घसरण झालेली नाही, तर सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे 2017 च्या मध्यापासूनच त्याची सुरुवात झाली होती. जीडीपी सातत्याने गेल्या सात तिमाहींमध्ये घसरत आहे आणि हे त्याचेच लक्षण असल्याचा हल्लाबोल सोनिया गांधींनी केला. माजी पंतप्रधान आणि जेडीएस नेते एच डी देवेगौडा, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, डीएमके नेते एम के स्टॅलिन, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

Leave a Comment