आषाढी वारीतील मानाच्या सातपैकी चार पालख्यांचा दिंडी सोहळा रद्द


औरंगाबाद : देशासह राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या महासंकटामुळे यंदा आषाढी यात्रा होणार की नाही हा सर्वात मोठा प्रश्न वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेला सध्या पडला आहे. दरम्यान मानाच्या पालखी आयोजकांनी यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सात मानाच्या पालखी सोहळ्यांपैकी आषाढी वारीसाठी एकनाथ महाराज पैठण, निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर, मुक्ताबाई, मुक्ताईनगर जळगाव आणि सोपान काका सासवड यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी पायी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, प्रस्थानाच्या दिवशी शासनाच्या नियमात राहून प्रस्थान होईल आणि दशमीपर्यंत पालखी सोहळा त्याच गावी मुक्काम राहील. दिंडी पैठणमध्ये नाथच्या जुन्यावाड्यातून समाधी मंदिरापर्यंत येईल आणि तिथेच दशमीपर्यंत मुक्कामी राहील. 30 मानकऱ्यांना दशमीला पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात यावी आणि मानाच्या पादुकांसह वेगवेगळ्या वाहनांनी हा सगळा प्रवास करण्यात येईल.

असे असले तरी शासनाकडे या सर्व मानकर्‍यांनी विनंती केली आहे की पायी सोहळ्यासाठी कमीत कमी पाच लोकांची परवानगी देण्यात यावी, तशी परवानगी मिळाली तर वर्षानुवर्षे चालत आलेली वारीची परंपरा खंडित होणार नाही. पाच लोकांसह सोहळा पूर्ण करण्यात येईल. पण परवानगी मिळाली नाही तर पंढरपूरला दशमीला जाण्याची तरी परवानगी देण्यात यावी अशी विनंती या सर्व मानकर्‍यांनी शासनाला केली आहे.

दरम्यान 15 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये आषाढी वारीचे नियोजन करण्यासाठी आळंदी आणि देहु देवस्थानच्या विश्वस्तांची बैठक पार पडली. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते. यावेळी आळंदी आणि देहुमधुन मोजक्या लोकांसह पायी पालखी सोहळा पार पाडला जावा. पण प्रशासनाकडून त्याची रुपरेषा ठरवली जावी, असा सुर या बैठकीत उमटला होता. कोरोनामुळे राज्यातील या सर्वात मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. परंतु, वारकरी संप्रदायाने परंपरा खंडित न करण्याची भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाला आहे. या बैठकीत 30 मे नंतर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असा निर्णय झाला आहे.

सात संतांच्या प्रमुख मानाचे पालखी सोहळे या यात्रेला हजारो भविकांसह पायी पंढरपूरला येत असतात. याशिवाय इतर 150 पालखी सोहळे राज्य आणि शेजारच्या राज्यातून पायी चालत येत असतात. सर्वात मोठे असलेले संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम पालखी सोहळे पुणे आणि पिंपरी चिंचवड या रेड झोनमधून येतात तर निवृत्तीनाथांची पालखी त्रंबकेश्वर, सोपानदेव यांची सासवड, नाथ महाराजांची पैठण तर मुक्ताईची मुक्ताईनगरमधून म्हणजेच रेड झोनमधून येते. दुसरीकडे सोलापूर जिल्हाही रेड झोनमध्ये असून अशावेळी आषाढी यात्रेला परवानगी दिल्यास कोरोना व्हायरसच्या फैलावाची भीती पंढरपूरकर नागरिक आणि प्रशासनाला भेडसावत आहे.

Leave a Comment