राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ‘निर्मलाताईं’वर सामनाचा घणाघात


मुंबई : रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्थलांतरित मजुरांची चौकशी करत त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवला. यावरुन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी टीका केली होती. त्या टीकेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिल्यानंतर यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे.

दिल्लीच्या रस्त्यांवर त्या मजुरांसोबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे थांबले, थोडा वेळ बसले आणि त्यांच्याशी बोलले. यावर निर्मलाताईंना अत्यंत दु:ख व्हावे हे आक्रितच म्हणावे लागेल. श्रमिकांचे दु:ख कुणी हलके करीत असेल तर सरकारला त्याचा आनंद व्हायला हवा, पण येथे उलटच सुरू असल्याचा सणसणीत टोला मोदी सरकारला शिवसेनेने लगावला आहे.

‘हे नवे कलियुग लॉक डाऊन : पर्व चार’ या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाच्या आजच्या अग्रलेखातून अर्थमंत्र्यांनी राहुल गांधींवर यांच्यावर केलेल्या टीकाला उत्तर देत मोदी सरकारवर टीकेचा बाण सोडला आहे. लॉकडाउन मंत्री कुरवाळत बसले आहेत आणि मजूर लॉकडाऊन तोडून कच्च्या-बच्च्यांसह रस्ते तुडवत निघाले आहेत. विरोधी पक्षाचा एक नेता गांधी नावास जागून त्या रस्त्यांवर मजुरांना कवटाळत उभा राहिला याचे ज्यांना दु:ख होते त्यांनी यापुढे माणुसकी व परंपरेच्या गप्पा मारू नयेत, अशी टीकाही या लेखातून शिवसेनेने केली आहे.

तसेच, हे मजूर महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांतून उत्तर प्रदेशात जायला निघाले तेव्हा त्यांना केंद्र सरकारने रोखले नाही. त्यांची व्यवस्था केली नाही. उत्तर प्रदेशच्या सीमेवर हे लाखो मजूर पोहोचले तेव्हा त्यांना तेथेच अडकवून ठेवले. उत्तर प्रदेशच्या सीमेत त्यांना येऊ देऊ नये, असे आदेश आहेत. तर महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यांत अडकलेल्या कर्नाटकच्या मजुरांना आणि इतर नागरिकांना 31 मेपर्यंत कर्नाटकात प्रवेश मिळणार नाही असे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनीही स्पष्ट केले आहे.

तसेच राज्या-राज्यांत अडकलेल्या बंगाली मजुरांना घेऊन येणाऱ्य़ा रेल्वेगाड्यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आधी विरोधच केला होता. नंतर एक महिन्याच्या कालावधीत 105 रेल्वेगाड्यांना त्यांनी होकार दर्शवला. आपल्याच लोकांविषयी त्यांची सरकारे असे कसे काय वागू शकतात? बाजूच्या देशांतील अल्पसंख्याक हिंदूंना पायघड्या घालणारी ही सरकारे आज बाजूच्या राज्यांतील आपल्याच बांधवांना स्वीकारायला तयार नाहीत. या अमानुष अस्पृश्यतेस काय म्हणावे? असा परखड सवालही सेनेने उपस्थितीत केला.

एकमेकांच्या हातातील अन्न-धान्य खेचून भुकेने बेजार झालेले लोक हाणामाऱ्य़ा करीत आहेत. अशीच घटना जबलपूर रेल्वे स्थानकावर घडली. बंगळुरू-हाजीपूर ही मजुरांना घेऊन जाणारी रेल्वे तेथे थांबली असता जेवणाचे पॅक वेळेवर न मिळाल्याने संतप्त झालेल्या मजुरांनी स्थानकावरील फूड स्टॉल, फूड व्हेण्डिंग मशीनची तोडफोड केली आणि तेथील अन्नपदार्थांची लूट केली. अशाप्रकारचा गोंधळ आज मर्यादित स्वरूपात दिसत असला तरी उद्या त्याचा भडका उडायला वेळ लागणार नाही, अशी चिंताही या लेखातून व्यक्त करण्यात आली.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करूनही अपेक्षेप्रमाणे रुग्णवाढीचा वेग कमी होताना दिसत नाही. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 35 हजारांवर गेला. मुंबईत 20 हजारांच्या आसपास आहे. मुख्यमंत्री व त्यांचे सरकार कोरोनाशी झटापट करीत आहे, पण कोरोना वाढतोच आहे. भविष्यात राज्य सरकारांना बहुधा हेच एकमेव काम करावे लागेल असेच चित्र दिसत आहे.

शैक्षणिक संस्था कधी उघडणार? कामगार कामावर कधी जाणार? (अर्थात नोकऱ्य़ा टिकल्या तर!) आकाशात विमाने कधी घिरट्या मारणार? रेल्वे रूळांवर लोकल्स कधी धडधडणार? बससेवा कधी सुरू होणार? मुंबईतील चित्रपटगृहांचा पडदा कधी बोलू लागणार? की आपण पुन्हा ‘मूकपटा’च्या जमान्यात किंवा जंगलयुगात जाणार? हे तूर्त तरी रहस्यच राहिले आहे. हे सर्व टप्प्याटप्प्याने चालू करायचा विचार करावा तर मुंबईतील 20 हजार कोरोनाग्रस्तांचा आकडा धोक्याची घंटा वाजवत असल्याची अशी भीतीही सेनेने अग्रलेखातून व्यक्त केली आहे.

Leave a Comment