खरा श्रीमंत ! भिकारी 100 कुटुंबांसाठी झाला अन्नदाता


नवी दिल्ली – जीवघेण्या कोरोना व्हायरसपुढे जगभरातील अनेक देश हतबल झाल्याचे चित्र बाधितांच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील सर्वच देश आपआपल्या परीने प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश मिळत नाही आहे. त्याला आपला देशसुद्धा अपवाद नाही.

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे प्रचंड प्रमाणात हाल झाले आहेत. अशा संकटकाळात अन्नधान्याविना हाल झालेल्या 100 कुटुंबांना चक्क एका भिकाऱ्याने महिन्याभराचे धान्य पुरवले आहे. पंजाबच्या पठाणकोटमध्ये असा भिकारी आहे, जो कोरोना योद्धा म्हणून समोर आला आहे.

लोकांकडे भीक मागून आपली उपजीविका करणार्‍या दिव्यांग राजूनेही असेच एक अनोखे उदाहरण समाजासमोर ठेवत आपल्या मनाची श्रीमंती दाखवली आहे, जे देशवासियांच्या कायम स्मरणात राहिल. राजूने आतापर्यंत 100 गरीब कुटुंबांना एक महिन्याचे रेशन आणि 3000 मास्कचे वाटप केले आहे. आपल्या ट्रायसिकलवरुन फिरत राजू दिवसभर भीक मागतो आणि भीक मागून जमलेल्या पैशातून तो होतकरु आणि गरजवंतांना मदत करतो. राजूने आपल्या भीक मागून जमलेल्या पैशांतून आजवर अनेक गरीब मुलींची लग्नदेखील लावून दिली आहेत.

आपल्या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल राजू सांगतो, जे काही पैसे दिवसभरात मिळतात, तो ते त्याच्या आवश्यकतेनुसार खर्च करतो आणि उरलेले पैसे जमा करून ठेवतो आणि गरजू लोकांमध्ये त्याचे वाटप करतो. पठाणकोटमधील धनगू रोडवरील रस्त्याकडे जाणारा पूल तुटला होता. ज्यामुळे लोकांना त्रास होत होता. त्याबाबत तेथील नागरिकांनी प्रशासनाकडे बर्‍याचदा तक्रारी केल्या. पण राजूने त्याच्या भीक मागून जमवलेल्या पैशांतून तो पूल दुरुस्त केला. त्याची आता पंजाबमध्ये सर्वत्र चर्चा आहे.

आपल्या स्वतःच्या कुटुंबीयांनीच दूर लोटण्याचे राजूला दुःख आहे. म्हणूनच जर मी काही चांगले कार्य केले, तर कदाचित शेवटच्या क्षणी माझ्या पार्थिवदेहाला खांदा देण्यासाठी तर चार लोक मिळतील. नाहीतर भिकारी जमिनीवर जगतात आणि जमिनीवरच मरतात. त्यांच्या मृतदेहाला कोणी खांदा देणाराही सापडत नाही.

राजू यासोबतच होतकरू आणि गरजवंतांच्या मुलांच्या शाळेची फीसुद्धा भरतो आणि त्याने आतापर्यंत 22 गरीब मुलींची लग्न लावून दिली आहेत. तो भंडारा भरवतो, उन्हाळ्यात लोकांसाठी पाण्याची व्यवस्थाही करतो. कोरोना विषाणूमुळे सरकारी यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे, पण राजू भिकारी हे काम करीत आहे, जे कोणत्याही सर्वसामान्याला लाजवेल असेच आहे.

Leave a Comment