लॉकडाउन 4.0 : चौथ्या टप्प्यात आरोग्य सेतूची सक्ती मागे


नवी दिल्ली : देशात लागू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान सरकारी किंवा खासगी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करण्यात आलेली आरोग्य सेतू अ‍ॅप सक्ती निरस्त करण्याचा आदेश केंद्र सरकारने रविवारी (17 मे) सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिले आहेत. त्यानुसार ज्यांच्या फोनमध्ये हे अ‍ॅप चालू करणे शक्य आहे, त्या कर्मचाऱ्यांनी ते सुरू ठेवावे असे सांगण्यात आले आहे.

गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अ‍ॅपच्या फायद्यावर सरकारने विशेष भर दिला आहे. सरकारने म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या धोक्यापासून हे अॅप युजरला अलर्ट करते. त्याचबरोबर या साथीच्या आजाराशी संबंधित बरीच महत्वाची माहितीही दिली जाते. कोरोनापासून बचाव आणि लक्षणांचीही माहिती या अॅपद्वारे मिळते.

लॉकडाऊनच्या यापूर्वीच्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचनांनुसार कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेतू अ‍ॅप बंधनकारक होते. पण आता यासाठी संबंधित कंपनीच्या मालकाने पूर्ण प्रयत्न करावेत, असे सूचविण्यात आले आहे. रविवारी जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जिल्हा प्रशासनाला कोणत्याही व्यक्तीला हा अ‍ॅप वापरण्याचा सल्ला देण्याचा अधिकार असणार आहे. तसेच, तो नियमितपणे त्याच्या आरोग्यावर नजर ठेवू शकतात.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी आणि लोकांपर्यंत सत्य माहिती पोहचवण्यासाठी आरोग्य सेतू अॅप लाँच केले होते. वापरकर्त्यांना या अॅपद्वारे कोरोना विषयीचे अपडेट हातातल्या मोबाईलमध्ये मिळत होते. त्यानुसार खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी देखील हे अॅप वापरणे बंधनकारक होते.

दरम्यान आरोग्य सेतू ॲपवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या अॅपद्वारे एक प्रकारे लोकांवर पाळत ठेवण्याचे काम होत असल्याची टीका त्यांनी केली होती. खासगी ऑपरेटरला आऊटसोर्स केल्यामुळे डेटा सिक्युरिटी आणि लोकांच्या प्रायव्हसीचे गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Leave a Comment