अखेर राज्यात दाखल झाल्या केंद्रीय पोलीस दलाच्या १० तुकड्या


मुंबई : राज्याभोवती कोरोनाचा वाढता फार्स लक्षात घेता, त्याचबरोबर वाढलेला लॉकडाऊन आणि त्यामुळे पोलिस यंत्रणेवर वाढता तणाव घेता राज्य सरकारने केंद्राकडून केंद्रीय पोलीस दलाच्या 20 तुकड्यांची मदत मागितली होती, त्यानुसार केंद्राने राज्याच्या मागणीला परवानगी देत त्यानुसार अखेर केंद्रीय पोलीस दलाच्या दहा तुकड्या महाराष्ट्रात दाखल करण्यात झाल्या आहेत. ज्या आजच राज्यातील विविध ठिकाणी रुजू होणार आहेत.

राज्यात दाखल झालेल्या या तुकड्यांमध्ये ५ रॅपिड अॅक्शन फोर्स, ३ CISF आणि CRPF च्या २ तुकड्यांचा समावेश आहे. दाखल झालेल्या एका तुकडीत १०० जवान आहेत. राज्यातील एकंदर परिस्थिती पाहता राज्य शासनाने एकूण २० तुकड्या मागवल्या होत्या, त्यातील १० तुकड्या सद्यस्थितीला केंद्राने पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

या तुकड्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, अमरावती येथे तैनात करण्यात येणार आहेत. रमजान ईद, पालखी सोहळा, गणेशोत्सव या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि महाराष्ट्र पोलिसांना विश्रांती देण्यासाठी या तुकड्यांना राज्यात पाचरण करण्यात आले आहे. राज्यात आलेल्या केंद्रीय पोलीस दलाच्या या तुकड्या कुठे तैनात करायच्या याचा अधिकार त्या-त्या ठिकाणाच्या पोलीस आयुक्तांना दिले असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यात लष्कराला पाचारण केले जाईल अशी चर्चा पाहायला मिळाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ती आधीच फेटाळून लावली होती. पण कोरोनामुळे ताण आल्याने थकलेल्या पोलीस यंत्रणेच्या मदतीसाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या मागवल्या जातील असे संकेतही त्यांनी दिले होते. त्यानुसार निमलष्करी दलाच्या 20 कंपन्या राज्यात पाचारण करण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती.

Leave a Comment