मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतेच केंद्र सरकारला महाराष्ट्रातील साखर उद्योगाला कोरोनाच्या संकटातून वाचवा, अशी मागणी करणारे पत्र पाठवले होते. त्यांनी यामध्ये कोरोनामुळे साखर उद्योगाला भेडसावत असलेल्या समस्यांचा पाढा वाचला होता. पण भाजप नेते निलेश राणे यांनी महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे साखर उद्योगासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुनही आता या उद्योगाला वाचवा म्हणण्याची वेळ का येते, असा खोचक सवाल उपस्थित केला होता. तसेच साखर उद्योगावर आजवर झालेल्या खर्चाचे ऑडिट करण्याची मागणीही निलेश राणे यांनी केली होती.
मी आपणास सांगू इच्छितो की @PawarSpeaks साहेबांनी साखर उद्योगासह 'कुक्कुटपालन' व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत.साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात.
त्यामुळे काळजी नसावी. https://t.co/Fqe9QWKBlQ— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 16, 2020
शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही निलेश राणे यांच्या या आरोपांना तितक्याच खोचक शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. निलेश राणे यांना उद्देशून रोहित पवार यांनी म्हटले आहे की, मी आपणास सांगू इच्छितो की, साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता यावर काय प्रतिक्रिया निलेश राणे देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान राज्यातील ठाकरे सरकारच्या कारभारावर नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे हे तिघेजण सातत्याने टीका करत असतात. भाजप आमदार नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांनी सायन रुग्णालयातील दुरावस्थेचा व्हिडिओ ट्विट करून खळबळ माजवली होती. त्याचबरोबर नितेश राणे इतर अनेक मुद्यांवरून सरकारला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नाहीत.