पुण्यातील लग्नाळूंना ‘या’ अटींच्या आधारावर करता येईल ‘लग्न’


पुणे – राज्यातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सध्या तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. पण या लॉकडाऊनमुळे अनेक लग्नाळूंच्या आनंदावर विरजण पडले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक विवाह सोहळे रद्द झाले आहेत तर काहींनी पुढे ढकलले आहेत. पण पुणे महानगर पालिकेने लग्नाळू मंडळींसाठी आनंदाची बातमी दिली आहे.

पुणे जिल्ह्यात कंटेनमेंट झोन वगळता कुठेही 50 नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न करण्यास आता परवानगीची गरज नाही. पण यासाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. लग्न सोहळ्याचे स्वरुप छोटे असावे त्याचबरोबर सोहळ्या दरम्यान सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळल्यास विवाह करण्यास काहीच बाधा येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

देशात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात सरकारने दिलेल्या नव्या आदेशामध्ये काही मार्गदर्शक सूचनांचा उल्लेख केला आहे. याचे नीट पालन केल्यास लग्न सोहळ्याला अनुमती देण्यास काहीच हरकत नसल्याचे महानगर पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

काय आहेत विवाह सोहळ्यासाठी महत्त्वाच्या अटी:

  • पुणे जिल्ह्यात 50 लोकांमध्ये लग्न करण्यासाठी परवानगीची गरज नाही.
  • कंटेनमेंट झोन वगळता जिल्हांतर्गत कुठेही जाऊन लग्न करता येऊ शकते.
  • पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील इतर कंटेनमेंट झोन वगळून जिल्हांतर्गत लग्नासाठी परवानगीची गरज नाही
  • सोशल डिस्टंसिंग ठेवून आणि नियमांचे काटेकोर पालन बंधनकारक आहे.
  • या लग्न सोहळ्यात कंटेनमेंट झोनमधील व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही.
  • त्याचबरोबर कोणालाही कंटेनमेंट झोनमधून ये-जा करता येणार नाही.

Leave a Comment