अभिजीत बिचुकलेंचा पंतप्रधान मोदींना पत्राच्या माध्यमातून सल्ला


सातारा : बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले यांनी आजवर अनेक निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे त्यांची राज्यभरात तसेच सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. पण आता ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. अभिजीत बिचुकलेंनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून त्यांना सल्ला दिला असून सोशल मीडियावर अभिजीत बिचुकलेंच्या नावाचे हे पत्र व्हायरल झाले आहे.

अभिजीत बिचुकलेंनी आपल्या पत्रात कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये सर्व शाळा-कॉलेज बंद ठेवण्याबाबतचे आदेश द्या, असे म्हटले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाने कहर माजवला आहे. 15 वर्षाखालील मुले ही भारताचे भविष्य आहेत. मुलांची रोगप्रतिकारशक्ती या वयात कमी असते. त्यामुळे जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही किंवा कोरोनाची साखळी तुटत नाही, तोपर्यंत यंदाच्या वर्षी सर्व शाळा-कॉलेज बंद करा, असा सल्ला मोदींना बिचुकलेंनी आपल्या पत्राच्या माध्यमातून दिला आहे.

त्याचबरोबर इयत्ता नववी पर्यंत अनेक राज्यात श्रेणी पद्धतीचा अवलंब करतात. त्यामुळे मुलांना शाळेत बोलवण्यापेक्षा वर्षभर शाळा बंद ठेवा. अन्यथा शाळा सुरु झाल्या तर खेळण्या-बागडण्याच्या नादात मुले सोशल डिस्टन्सिंग पाळणार नाहीच आणि त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढेल, असेही बिचुकलेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Leave a Comment