मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू सतत ५५ दिवस लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. त्याचबरोबर काही कंपन्यांनी तर जाणीवपूर्वक आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे जबरदस्ती राजीनामे घेतले आहेत. या लॉकडाऊनला खासगी वाहतूक क्षेत्र देखील अपवाद नाही. या क्षेत्रावरही लॉकडाऊनचा विपरीत परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमुळे सेवा क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे आणि त्यामुळे तेथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या उबेरनेही नारळ दिला आहे. पण उबेरने केलेल्या कर्मचारी कपातीनंतर सोशल मीडियातून कंपनीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
देशातील सर्वच घटकांवर कोरोना व्हायरसमुळे लागू असलेल्या लॉकडाऊनचा विपरीत परिणाम झाला आहे. लॉकडाऊन कालावधीत देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले उद्योगधंदेही बंद असल्यामुळे, येथील उद्योजक, कर्मचारी यांच्याही दैनंदिन जीवनावरही कोरोनामुळे विपरीत परिणाम झाला आहे. आता टप्प्या टप्प्यात उद्योग जगत सुरु करण्यात येत आहे. पण अनेकांना आपली नोकरी जाण्याची भीती वाटत आहे. तर, मोठ्या शहरांमधून लाखो मजूर गावी परतल्यामुळे कामगारांची उपासमार आणि संबंधित उद्योजकांना कामगारांची कमतरता, असा विरोधाभास दिसत आहे.
इतर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार कंपनीच्या ३७०० कर्मचाऱ्यांना उबेर कंपनीच्या कस्टमर सर्व्हिस प्रमुख रॉफिन शेवले यांनी एका व्हिडिओ कॉलसाठी एकत्र बोलवल्यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांना केवळ तीन मिनिटांतच नोकरीवरुन कमी केल्याची घोषणा केली. आता त्यानंतर सोशल मीडियातून कंपनीच्या या निर्णयाचा आणि या पद्धतीवर रोष व्यक्त केला जात आहे. मानवाधिकार संघटनेशी संबंधित नागरिकांना कंपनीच्या या निर्णयानंतर कंपनीवर कडाडून टीका केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशा असंवेदशीलपणे काढून टाकण्यात आल्यामुळे नेटकऱ्यांनी याचा विरोध केला आहे.