शेतकरी दादाहो… किसान योजनेचे २,००० रुपये जमा झाले नसतील तर ‘अशी’ करा तक्रार


नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मागील २२ मार्चपासून लॉकडाऊन लागू असल्यामुळे अनेक लहान-मोठे उद्योगधंदे बंद असल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पार डळमळीत झाली आहे. अशातच मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना देशातील नागरिक आणि व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली.

गुरुवारी पत्रकार परिषद घेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले की, १८ हजार २५३ कोटी रुपये पंतप्रधान किसान योजनेतंर्गत ९.१३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आले आहेत. तुमच्या खात्यात जर हे पैसे आले नसतील तर याची तक्रार सरकारने दिलेल्या संपर्क क्रमांकावर करु शकता तसेच तुम्ही हे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना कळवू शकता.

सरकारच्या अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर जाऊन तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२० ची नवीन यादी शोधू शकता. त्याचबरोबर लाभार्थ्यांची यादी आणि ऑनलाईन अर्जदेखील दाखल करु शकता. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी मंत्रालयाच्या माहितीनुसार या महिन्याच्या अखेर किंवा पुढील महिन्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी लाभार्थ्यांची नवीन यादी जारी करण्यात येणार आहे.

तुमच्या खात्यात जर पैसे जमा झाले नसतील तर कशी कराल तक्रार?

  • कृषी मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या तक्रार निवारण हेल्पलाइनवर तुम्ही थेट संपर्क साधू शकता. पीएम किसान हेल्पलाइन नंबर – १५५२६१, पीएम किसान टोल फ्री – १८००११५५२६, पीएम किसान लँडलाइन नंबर ०११-२३३८१०९२, २३३८२४०१ त्यासोबत [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क करु शकता.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर आपण अर्ज केला असेल आणि लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव पाहायचे असेल तर सरकारने आपल्यासाठी आता ही सुविधा ऑनलाइन देखील उपलब्ध करुन दिली आहे.
  • अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२० ची नवीन यादी तपासली जाऊ शकते.
  • त्यासाठी शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल. यामध्ये आपल्याला दिलेल्या फार्मर कॉर्नर टॅबवर क्लिक करावे लागेल. शेतकर्‍यांना या टॅबमध्ये पंतप्रधान किसान योजनेंतर्गत नावनोंदणी करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. आपण जर यापूर्वी देखील अर्ज केला असेल आणि आपला आधार योग्य प्रकारे अपलोड केला गेला नसेल किंवा काही कारणास्तव आधार क्रमांक चुकीचा नोंद झाला असेल तर त्याची माहिती देखील त्यात दिसून येईल.
  • या योजनेचा लाभ ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना मिळाला असेल त्यांची नावेही राज्य / जिल्हावार / तहसील / गावानुसार पाहता येतील. यात सरकारने सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी अपलोड केली आहे. त्याचबरोबर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे याचीही माहिती मिळू शकेल.
  • याबाबत शेतकर्‍यांना आधार क्रमांक / बँक खाते / मोबाइल नंबरद्वारेही माहिती मिळू शकते. याखेरीज पंतप्रधान किसान योजनेसंदर्भात स्वत: ला अद्ययावत ठेवायचे असेल तर त्याची लिंकही देण्यात आली आहे. या लिंकच्या माध्यमातून आपण गुगल प्ले स्टोअरवरुन पंतप्रधान किसान मोबाइल अँप डाउनलोड करू शकता.

या योजनेचा शेतकरी असूनही लाभ मिळाला नसेल तर ?

  • सर्व शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना मोदी सरकारने लागू केली असेल, पण योजनेत लोकांसाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. या योजनेचा गैरफायदा घेण्याचा जे लोक प्रयत्न करतील ते आधार पडताळणीतून उघड होईल. सर्व १४.५ कोटी शेतकरी कुटुंबे योजनेसाठी पात्र आहेत. पती-पत्नी आणि १८ वर्षांपर्यंतची मुले एकच गणली जातील. ज्यांची नावे १ फेब्रुवारी २०१९ पर्यंत भूमी अभिलेखात सापडतील ते योजनेस पात्र असतील.
  • याचा लाभ खासदार, आमदार, मंत्री आणि महापौरांना मिळणार नाही. भलेही ते शेती करत असतील म्हणून त्यांनी अर्ज केला असेल तर पैसे येणार नाहीत. मल्टी टास्किंग स्टाफ / चतुर्थ श्रेणी / ड वर्ग कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त केंद्र किंवा राज्य सरकारमधील कोणताही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला लाभ मिळणार नाही. जर अशा लोकांना फायदा झाला तर आधारमधून ते उघडकीस येईल.
  • या योजनेचा व्यावसायिक, डॉक्टर, अभियंते, सीए, वकील, आर्किटेक्ट जे शेती करत असतील तर त्यांनाही लाभ मिळणार नाही. इन्कम टॅक्स भरणारे आणि १० हजारांपेक्षा जास्त पेन्शन मिळते त्यांना योजनेचा फायदा मिळणार नाही. जर कोणत्याही आयकरदात्याने योजनेचे दोन हप्ते घेतले असतील तर तो तिसऱ्यावेळी तो पकडला जाईल. कारण आधार पडताळणी होत आहे.

Leave a Comment