संकट काळात पंतप्रधानांच्या पाठीशी संपूर्ण देशाने उभे राहणे गरजेचे


मुंबई: काल देशातील जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. आत्मनिर्भर भारत अभियान असे या पॅकेजला नाव देण्यात आले असून कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेले २० लाख कोटी रुपयांचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक पॅकेज आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.

याबाबत संजय राऊत म्हणाले की, देशातील शेतकरी, मजूर, लघू-मध्यम उद्योगांना नरेंद्र मोदींनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. देशाला अशा कठिण परिस्थितीत अशा प्रकारच्या पॅकेजची खूप गरज असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर देशासमोर कोरोना सारख्या महामारीचे मोठे संकट उभे असताना यावेळी पंतप्रधानांवर टीका करणे योग्य नाही. संपूर्ण देशाने अशा परिस्थितीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

देशवासियांना संबोधित करताना नरेंद्र मोदींनी स्वदेशीचा नारा दिला. स्वावलंबी भारत आम्ही बनवू शकतो आणि आम्ही निश्चय केला तर कोणतेही लक्ष्य साध्य करु शकतो. मला असा आत्मविश्वास आहे की भारत निश्चितच स्वावलंबी होऊ शकतो. शेतकरी, श्रमिक, गरीब, मध्यम वर्गासह समाजातील सर्व घटकांसोबत कुटीर, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगाला दिलासा देण्यासाठी घोषित केलेल्या २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक योजनेने स्वावलंबी भारताला गती मिळेल, असे नरेंद्र मोदींनी म्हटले होते. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजशी निगडीत तपशीलवार माहिती पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Comment