
नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली तरी केंद्र सरकार त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. विकसित देशांमध्ये जशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५९ हजार ६६२ वर पोहचला आहे.
कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास भारत समर्थ – डॉ. हर्षवर्धन
हर्षवर्धन यांनी पुढे सांगितले की, इतर विकसित देशांमध्ये जशी परिस्थिती आहे, तशी अत्यंत गंभीर परिस्थिती आपल्याकडे होण्याची शक्यता आम्हाला वाटत नाही. पण तरी देखील कोणत्याही गंभीर परिस्थितीला तोंड देण्याच्या दृष्टीने आमची पूर्ण तयारी झालेली आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात ३३२० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनाने ९५ जणांचा बळी घेतला आहे. देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ५९ हजार ६६२ वर पोहचला आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले ३९ हजार ८३४ रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले १७ हजार ८४७ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १९८१ जणांचा समावेश आहे.
