केंद्र सरकारने काँग्रेसच्या न्याय योजनेप्रमाणे गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा करावे


नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी लॉकडाऊन हा एखादा ऑन-ऑफ स्विच नसल्यामुळे देशातील लॉकडाऊन कशाप्रकारे उठवायचा याची निश्चित रणनीती केंद्र सरकारने ठरवली पाहिजे, असे मत व्यक्त केले. आता केंद्र सरकारने लॉकडाऊननंतर देश कसा सुरु करायचा, याची नीट आखणी केला पाहिजे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांनी म्हटले की, लॉकडाऊन हा एखादा ऑन-ऑफ स्विच नसल्यामुळे देशात लॉकडाऊनंतर काय करायचे, याचे नियोजन सरकारने केले पाहिजे. त्याचबरोबर आपल्या कारभारात सरकारने पारदर्शकता आणायला पाहिजे. लोकांना सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगायला हव्यात. तसेच निर्णय घेताना केंद्रीकरण टाळले पाहिजे, असे राहुल यांनी म्हटले आहे.

या लॉकडाऊनची मोठी झळ बसलेल्या लोकांना सर्वप्रथम तात्काळ मदत पुरविली पाहिजे. अन्यथा आपण काहीच करु शकणार नाही. या लोकांच्या बँक खात्यांमध्ये काँग्रेसने आखलेल्या न्याय योजनेप्रमाणे तात्काळ पैसे जमा केले पाहिजेत. आजच स्थलांतरित कामगार, गरीब आणि लघुद्योगांना आर्थिक मदत केली पाहिजे. नंतर वेळ निघून गेल्यावर मदत करून काही फायदा होणार नाही. कारण, या उद्योगांना आर्थिक मदत न केल्यास देशात बेरोजगारीची त्सुनामी येईल, अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

तसेच कोरोना व्हायरसची लोकांच्या मनातून भीती दूर झाली पाहिजे, असे मतही राहुल गांधी यांनी मांडले. कोरोनाचा जास्त धोका एका विशिष्ट वयोगटातील लोकांनाच आहे. ही गोष्ट वगळता कोरोना व्हायरस तितकासा धोकादायक नाही. पण लोकांना तरी देखील कोरोनाची भीती वाटत आहे. लोकांच्या या मानसिकतेत बदल घडवण्याची गरज आहे. हा लॉकडाऊन उठवण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्यासाठी सरकारने लोकांच्या मनातील भीती सर्वप्रथम दूर केली पाहिजे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

Leave a Comment