आजपासून ‘वंदे भारत मिशन’, विदेशात अडकलेल्या भारतीयांचे एअरलिफ्ट!


मुंबई : आजपासून विदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या सर्वात मोठ्या अभियानाला सुरुवात होणार असून या अभियानाला ‘वंदे भारत मिशन’ असे नाव देण्यात आले आहे. जवळपास 15 हजार भारतीयांना विमान आणि जहाजातून टप्प्याटप्प्याने मायदेशी आणले जाणार आहे. यासाठी विमानतळे आणि बंदरे पूर्णत: सज्ज करण्यात आली आहेत. आज अबूधाबीवरुन एअर इंडियाचे विमान 200 भारतीयांना घेऊन येणार आहे. परराष्ट्रातून उड्डाण होण्याआधी सर्व प्रवाशांची मेडिकल स्क्रीनिंग होणार आहे.

दरम्यान, या नागरिकांना मायदेशी परतीच्या प्रवासासाठी काही मोबदलाही द्यावा लागणार आहे. लंडन ते मुंबई या प्रवासासाठी 50 हजार रुपये, तर शिकागो ते दिल्ली या प्रवासासाठी साधारणपणे 1 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. एकूण 64 विमानांपैकी 10 विमाने यूएई, 2 कतारमध्ये, 5 सौदी अरेबिया, 7 ब्रिटनमध्ये, 5 सिंगापूरमध्ये, 7 अमेरिकेमध्ये, 5 फिलिपाईन्स, 7 बांग्लादेश, 2 बहारीनमध्ये, 7 मलेशियात, 5 कुवैतमध्ये, 4 ओमानमध्ये उड्डाण करणार आहेत. हे भारतीय आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक बंद झाल्यानंतर जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात अडकून पडले होते.

देशभर कोरोना व्हायरसमुळे लावलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या आगमनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. आजपासून (7 मे) हवाई आणि समुद्रमार्गे होणाऱ्या या अभियानाची सुरुवात होईल. या भारतीयांना टप्प्याटप्प्याने आणण्यासाठी केंद्र सरकारने एक तपशीलवार प्लॅन आखला आहे. विमाने आणि नौदलाच्या जहाजातून या भारतीयांना देशात आणले जाणार आहे. एअर इंडियाचे विमान 200 नागरिकांना घेऊन अबूधाबीवरुन उड्डाण करेल आणि केरळच्या कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर तिरुवनंतरपुरम, दिल्ली आणि मुंबईसह अनेक विमानतळावर आरोग्यासंबंधी सर्व व्यवस्था केली आहे.

आखाती देशांपासून मलेशियापर्यंत, ब्रिटनपासून अमेरिकेपर्यंत विविध देशात अडकलेल्या भारतीयांना ‘वंदे भारत मिशन’ नावाच्या या अभियानांतर्गत मायदेशात परत आणले जाणार आहे. एअर इंडिया यासाठी 12 देशांमधून सुमारे 15000 भारतीयांना टप्प्याटप्प्याने परत आणणार आहे. पहिल्या टप्प्यात 13 मे पर्यंत 64 उड्डाणे होतील. 13 मे नंतर खासगी विमान कंपन्यांही भारतीयांना परत आणण्याच्या मोहीमेत सामील होऊ शकतात. पहिल्या दिवशी परदेशातील विविध ठिकाणांहून 10 उड्डाणे होती. आज कोचीसह कोळीकोड, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद आणि श्रीनगरमध्ये विमाने दाखल होतील. ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळलेली नाहीत, त्यांनाच देशात परत आणले जाणार आहे.

याशिवाय मायदेशात पोहचल्यानंतर त्यांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक आहे. भारतात आल्यानंतरही त्यांची मेडिकल टेस्ट होणार आहे. त्यानुसार त्यांना पुढचे 14 दिवस क्वॉरन्टाईन राहावे लागणार आहे. त्यानंतर त्यांची पुन्हा कोरोना टेस्ट होणार आहे. शिवाय राज्य सरकारांना सुद्धा अशा नागरिकांबाबत जी काळजी घ्यायची आहे, त्याबाबतचे निर्देश केंद्राने दिले आहेत.

Leave a Comment