केंद्र सरकार अटी व शर्थींसह सार्वजनिक वाहतूक सुविधा सुरू करण्याच्या विचारात


नवी दिल्ली : संपूर्ण देशात सार्वजनिक वाहतूक सुविधा लॉकडाऊनमुळे बंद ठेवण्यात आली असून देशभरातील विविध राज्यात अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर लोकांसाठी राज्यांच्या विनंतीवरून कामगारांसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या चालवण्यात येत आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भविष्यकाळात केंद्र सरकार अटी व शर्थींसह सार्वजनिक वाहतूक सुविधा सुरू करण्याच्या विचारात असल्याचे संकेत दिले आहेत.

केंद्र सरकारने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी 17 मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. बस आणि कार ऑपरेशन कॉन्फेडेरशन ऑफ इंडियाच्या सदस्यांशी नितीन गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. बस आणि कार चालकांना लॉकडाऊनमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी या वेळी दिले.

गडकरी म्हणाले, सार्वजनिक वाहतूक आणि महामार्ग खुले केल्यानंतर लोकांमध्ये आत्मविश्वास येईल असा अंदाज आहे. पण आधी यासाठीही नियमावली आखून देण्यात येईल आणि त्यानंतरच सार्वजनिक वाहतूक सुविधा सुरू करण्यात येईल. कोरोना विरुद्धच्या या लढाईत आपण सर्वांनी एकत्र येऊन लढल्यास नक्की यशस्वी होऊ.

देशात शुक्रवारी 40 दिवसांनंतर पहिली रेल्वे चालवण्यात आली. 1200 कामगारांना घेऊन जाणारी विषेश ट्रेन झारखंडमधील हतिया येथे पोहोचली. हैदराबादजवळील लिंगमपल्ली येथून ही विशेष गाडी सोडण्यात आली होती. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेची विशेष गाडी धावली आहे. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. या ट्रेनमधील सर्व कामगारांची जिल्ह्यातील कार्यालयात तपासणी होणार आहे. यानंतर त्यांना 14 दिवस होम क्वॉरन्टाईन करण्यात येणार आहे.

Leave a Comment