विशेष रेल्वे गाड्या या राज्यांच्या विनंतीनुसारच सुरु – रेल्वे मंत्रालय


नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनमध्ये सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आहे. पण या वाढलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील अन्य राज्यात अडकून पडलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने दिलासा देत त्यांच्या मूळ राज्यात पोहोचवण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरु केल्या आहेत. पण या गाड्या केवळ संबंधित राज्य सरकारांच्या विनंतीनुसारच सुरु करण्यात आल्यामुळे नेहमीच्या इतर पॅसेंजर रेल्वे गाड्या सध्या बंद रहाणार असल्याचे स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाने दिले आहे.

शनिवारी प्रसिद्धी पत्रकारद्वारे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले की, काही विशेष रेल्वे गाड्या सध्या सुरु करण्यात आल्या असून कामगार, भाविक, पर्यटक, विद्यार्थी आणि देशात इतर ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी या गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या रेल्वे गाड्या राज्यांच्या विनंतीनुसार सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे इतर सर्व पॅसेंजर रेल्वे गाड्यांची वाहतूक अद्यापही स्थगितच ठेवण्यात आली आहे.

राज्य सरकारने नोंदणी करुन आणि विशेष सुविधांद्वारे आणलेल्या प्रवाशांनाच रेल्वे गाड्यांमध्ये प्रवेश दिला जात असल्यामुळे रेल्वे स्थानकात या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रवाशाला किंवा प्रवाशांच्या ग्रुपला येण्यास परवानगी नाही. कुठल्याही गाड्यांची तिकिट विक्री कुठल्याही रेल्वे स्टेशनवर केली जात नाही. राज्य सरकारांनी विनंती केलेल्या व्यतिरिक्त रेल्वेकडून कुठल्याही इतर गाड्या सोडल्या जात नाहीत, या बाबींवर रेल्वे मंत्रालयाने भर दिला आहे.

त्याचबरोबर अद्याप इतर सर्व पॅसेंजर आणि उपनगरीय रेल्वे गाड्यांची सेवा स्थगितच केलेली असल्यामुळे कुणीही रेल्वे स्टेशनला जाऊ नये. त्याचबरोबर कोणीही याबाबत कुठलीही चुकीची बातमी पसरवू नये, असे आवाहनही या प्रसिद्धी पत्रकाद्वारे रेल्वे मंत्रालयाने केले आहे.

Leave a Comment