लखनऊ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना देशभरातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्यासाठी तबलिगी जमात जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. कोरोनाचे वाहक म्हणून तबलिगी जमातसाठी काम करणाऱ्या लोकांनी काम केल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले.
कोरोनाचा फैलाव तबलिगी जमातने केला नसता तर आपण लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यातच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असते, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. तबलिगी जमातीकडून हा गुन्हा घडला असून त्यांच्यावर त्याच पद्धतीने कारवाई केली पाहिजे, असे मतही यावेळी योगी आदित्यनाथ यांनी मांडले. उत्तर प्रदेशात तबलिगी जमातशी संबंधित तीन हजार लोक सापडले असल्याचा दावा योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केला आहे.
कोणताही आजार होणे हा गुन्हा नाही. पण कोरोनासारख्या गंभीर आजाराची माहिती लपवून ठेवणे हा नक्कीच दंडनीय गुन्हा आहे. या कायद्याचे ज्यांनी उल्लंघन केले आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार, अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.