लॉकडाऊन दरम्यान देशात धावल्या सहा विशेष ट्रेन; पहिली ट्रेन 1200 मजुरांना घेऊन रांचीत दाखल


नवी दिल्ली : देशभरात विविध राज्यात लॉकडाऊनमुळे अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर लोक स्वगृही परतण्यास सुरुवात झाली असून विविध राज्यांच्या विनंतीवरून रेल्वेकडून शुक्रवारी कामगारांसाठी देशभरात 6 विशेष गाड्या चालवण्यात आल्या. ज्या लोकांना आपल्या राज्यात परतण्याची इच्छा आहे, अशांसाठी देखील लवकरच परतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

शुक्रवारी देशात 40 दिवसांनंतर पहिली रेल्वे चालवण्यात आली. झारखंडमधील हटिया येथे 1200 कामगारांना घेऊन जाणारी विषेश ट्रेन पोहोचली असून ही विशेष गाडी हैदराबादजवळील लिंगमपल्ली येथून सोडण्यात आली होती. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेची विशेष गाडी धावली आहे. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. या ट्रेनमधील सर्व कामगारांची जिल्ह्यातील कार्यालयात तपासणी होणार आहे. यानंतर त्यांना 14 दिवस होम क्वॉरन्टाईन करण्यात येणार आहे.

हैदराबाद- झारखंड यासह देशात काल कामगारांना घेऊन जाण्यासाठी एकूण सहा ट्रेन चालवल्या गेल्या. यात तेलंगणा ते झारखंड, महाराष्ट्रातील नाशिक ते उत्तर प्रदेशमधील लखनऊ, महाराष्ट्रातील नाशिक ते भोपाळ, राजस्थानमधील जयपूर ते बिहारमधील पाटणा, झारखंडमधील रांची ते राजस्थानमधील कोटा, केरळमधील अलुवा ते ओडिशामधील भुवनेश्वरपर्यंतच्या गाड्यांचा समावेश आहे.

दरम्यान, देशभरात विविध राज्यात लॉकडाऊनमुळे अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर लोक लवकरच स्वगृही परतणार आहेत. या सर्वांना आपापल्या घरी पोहचवण्यासाठी कामगार दिनापासून “श्रमिक विशेष” रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी गृहमंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

प्रोटोकॉलनुसार अशा अडकलेल्या लोकांना पाठवणे किंवा स्वगृही आणण्यासाठी संबंधित दोन्ही राज्य सरकारच्या विनंतीनुसार या विशेष गाड्या चालवल्या जातील. रेल्वे आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या श्रमिक स्पेशलच्या समन्वय आणि सुरळीत कारभारासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

प्रवाशांना पाठवण्याअगोदर प्रत्येक राज्याने त्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. जे निरोगी प्रवासी आहेत, अशानाच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार आहे. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर या प्रवाशांच्या तुकड्या करुन पाठवण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी चालवण्यात येणाऱ्या रेल्वे आणि बस गाड्या सॅनिटाईज करणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घालणे बंधनकारक असेल. प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय प्रारंभीच्या स्टेशनवर पाठविणार्‍या राज्यांद्वारे करण्यात येणार आहे.

Leave a Comment