मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत; लॉकडाउनमधून मुंबई, ठाणे, पुणेकरांना दिलासा नाही


मुबंई – राज्यातील जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई, ठाणे, पुणेकरांना लॉकडाउनमधून दिलासा दिला जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद येथील आकडे पाहता तेथे काही करणे आपल्या हिताचे नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्यामुळे रेड झोनमध्ये असणाऱ्या मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबादमध्ये लॉकडाउन वाढवला जाण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जाहीर करण्यात आलेला देशव्यापी लॉकडाउन या महिन्याच्या ३ तारखेला संपत असून लॉकडाउन यानंतर वाढवला जाणार की नाही यासंदर्भात चर्चा सुरु आहे. याबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, ३ मे नंतर काय करायचे हा महत्त्वाचा विषय असून तुमच्या पैकी अनेकांना आम्ही काय करायचे ? किती काळ घरी बसायचे ? असे प्रश्न पडले असतील. अर्थचक्र रुतले आहे. बेरोजगारी वाढणार असल्याचे विविध माध्यमातून सांगितले जात आहे. हे खरे आहे, नाही असे म्हणणे योग्य नाही. पण अर्थासोबत संपत्ती जर म्हणाल तर प्रत्येक राष्ट्राची आणि राज्याची महत्त्वाची आणि खरी संपत्ती त्यांची जनता असते. त्यामुळे त्यांना प्राथमिकता दिलीच पाहिजे. नागरिक वाचले पाहिजेत. यावेळी ते सैनिक आहेत. ते वाचले तर हा गाडा चिखलातून आपण सहजरित्या बाहेर काढून पुढे नेऊ शकतो.

रेड झोन म्हणजे जागृत ज्वालामुखी, ऑरेंज झोन म्हणजे निद्रिस्त ज्वालामुखी आणि ग्रीन झोन म्हणजे तो ज्वालामुखी पुन्हा पेटेल असे वाटत नाही. पण जर कोणी कोरोना रुग्ण ग्रीन झोनमध्ये आला तर पुन्हा हाहाकार माजू शकतो. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. मुंबई आणि मुंबईचा परिसर रेड झोनमध्ये आहे. त्यामध्ये कल्याण आणि पनवेलपर्यंतचा काही परिसर देखील येतो. पुणे आणि आजुबाजूचा परिसर तसेच नागपूर, औरंगाबादमधील काही ठिकाणे आहेत. या ठिकाणी आकडे वाढत असल्यामुळे त्याठिकाणी काही करणे हिताचे ठरणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या ठिकाणी लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे.

ऑरेंज झोनमध्ये म्हणजे जिथे संख्या वाढत नाही आहे, पण अद्यापही रुग्ण आहेत तिथे काही परिसर सोडले तर उरलेल्या जिल्ह्यात काय सुरु करु शकतो याचा निर्णय झाला आहे. आपण आधीच ग्रीन झोनमध्ये शिथिलता आणत असल्याचे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर परराज्यात जे जाऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. आपण त्यांच्यासाठी सोय करत आहोत पण लगेच झुंबड करु नका अन्यथा ती परवानगीही काढून टाकली जाईल, उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment