आगामी चार दिवसात होऊ शकतो मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांना गावी पाठवण्याचा निर्णय


मुंबई : मुंबई-पुण्यातील चाकरमान्यांना गावी पाठवण्याच्या संदर्भात सुरु असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून यासंदर्भात काल मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आशिष कुमार सिंग यांनी आपणाशी तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे चाकरमान्यांनो बॅगा भरून ठेवा, येत्या चार दिवसात सरकारकडून गावी पाठवण्याचा निर्णय होईल अशी माहिती माजी मंत्री व गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली

पुढे ते म्हणाले की, कोरोनामुळे मुंबई पुणे येथे गेल्या महिनाभरापासून अडकून पडलेल्या चाकरमान्यांना गावी आणण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आपण लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अडकून पडलेल्या चाकरमान्यांना गावी आणण्यासाठी पाठपुरावा केला. राज्यात ज्यावेळी कोरोनाचा शिरकाव झालेला नसताना त्यावेळी सुरू असलेल्या अधिवेशनात या संदर्भात आपण सातत्याने आपली भूमिका मांडली होती, त्याला आता यश येत आहे. त्यासंदर्भात मंगळवारी आपणाकडून मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आशिष कुमार सिंग यांनी अधिक माहिती घेतली, त्याचबरोबर जिल्हाधिकारी पोलीस अधिक्षक यांच्याकडूनही काय उपाययोजना करता येईल हे समजावून घेतल्यामुळे आगामी दिवसात सरकारकडून चाकरमान्यांना गावी पाठवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल. लॉकडाऊनमुळे कोंडून राहिलेल्या चाकरमान्यांना बाहेर काढणे महत्वाचे बनले आहे.

चाकरमान्यांना गावी नेण्यासाठी एसटीचा पर्याय महत्वाचा आहे. त्यासंदर्भात आपण काही सूचना केल्या आहेत. केवळ 30 चाकरमान्यांना एका फेरीत एसटी बसने त्यांच्या गावी पाठवले जाईल. त्यांना ज्या गावात विरोध होईल तेथे एकत्रितपणे त्यांच्या राहण्यासह खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाईल. मुंबईतून निघताना आणि येथे आल्यानंतर नियमितपणे त्यांची आरोग्य तपासणी केली जाईल. गावात विलगीकरण करताना येणाऱ्या या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. मुळातच आजचा अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मोठा गोंधळ सुरू आहे. बाहेरचे भाजीवाले कांदा बटाटे वाले गावात गाड्या घेऊन आलेले चालतात. मग चाकरमानी गावात का नकोत, त्यांनाच विरोध का? गावागावातून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आपण मतदार संघाचा दौरा करत गावातील प्रमुख मंडळींशी चर्चा केली, ते त्यांना पटवून दिले. त्यानुसार आता सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. चाकरमान्यांना स्वीकारण्यास ग्रामस्थही तयार झाल्यामुळे आता कोणतीही अडचण येणार नाही.

आपण लॉकडाऊनच्या काळात अनेकांना मदत केली, उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा अपडेट ठेवली. आजच्या अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली पुरता गोंधळ सुरू आहे, त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी कालच डीवायएसपी दर्जाचा अधिकारी नियुक्त केला आहे. मुंबईमध्ये तर स्वतंत्र यंत्रणा उभारून त्यानुसार आरोग्य मदत कार्य सुरू ठेवले, आपण याची कुठेही जाहीर वाच्यता केली नाही. आजही मदतकार्य सुरू आहे. ज्यांच्यावर कोकणचे अर्थकारण अवलंबून आहे, त्या चाकरमान्यांना गावाकडे आणलेच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment