सध्याच्या घडीला मला राजकारणात नाहीतर समाजकारणात स्वारस्य


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव आणि त्यावर सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांसंदर्भात संवाद साधत माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी सत्ता येते जाते, पण जीव गेला तर परत येत नसल्याचे म्हटले. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असला तरी आपण त्याची पूर्ण तयारी केलेली आहे. पण यातही काही लोक राजकारण करत आहेत. सध्याची वेळ ही राजकारण करण्याची नाही. जे अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण करत आहेत त्यांना त्यांचे काम करु द्या. मला माझ्या महाराष्ट्रातील लोकांचे जीव वाचवायचे आहेत, त्याचे राजकारण करायचे नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले की, आपण लॉकडाऊनमुळे कोरोनाचा गुणाकार कमी करण्यात यशस्वी झालो आहोत. आपण काही प्रमाणात कोरोनाची वाढ नियंत्रणात ठेवली आहे. पण, दोन पोलिसांचा या लढाईत मृत्यू झाला आहे. मी कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांनी आंदराजली वाहतो. दोन पोलीस आपल्यासाठी लढताना शहीद झाले आहेत. त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते करू, पण माणूस गेला आहे. डॉक्टरांसह पहिल्या फळीतील कर्मचारी आणि अधिकारी जीव धोक्यात घालून तणावाखाली काम करत आहेत, त्यांना सहकार्य करणे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.

ते म्हणाले की, आता सगळे दिवस सारखे झाले आहेत. सर्व दिनदर्शिका दीन झाल्या आहेत. उगवणारा दिवस विचारतो आहे काय होणार आज आणि मावळणारा दिवस म्हणतो काय झाले आज?. त्यांनी यावेळी मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या तसेच अक्षयतृतीयेच्या देखील शुभेच्छा देखील दिल्या. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सर्वधर्मियांना मी धन्यवाद देतो. त्यांनी आपापल्या धार्मिक सणांना बाजूला ठेवले आहे. सर्वधर्मीयांची धर्मस्थळे ह्या सगळ्या काळात बंद आहेत. मग तुम्ही म्हणाल की देव कुठे आहे? तुम्ही जो संयम पाळता त्यात देव आहे. डॉक्टर्स, पोलिस, सफाई कामगार अशा सर्व सेवा देणाऱ्यांमध्ये देव आहे. यांचा आदर करणे हीच देवांना खरी मानवंदना आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, राज्यात अडकलेल्या परप्रातियांना आम्ही हळू हळू घरी पाठवण्याची व्यवस्था करु. संयम ठेवणे गरजेचे आहे. हा विषाणू आपला संयम कधी तुटतो आहे का याची वाट पाहत असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Comment