राज्य सरकारचे आदेश मिळत नाही तोपर्यंत बंदच राहणार मुंबईतील दुकाने


मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनच्या काळात काही दुकाने सुरु करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. पण मुंबईतील दुकाने बंद राहण्याची शक्यता असून मुंबईतील दुकाने राज्य सरकारचे आदेश मिळेपर्यंत बंदच राहणार, अशी भूमिका रिटेल ट्रेडर्स असोशिएशनने घेतली आहे.

मुंबईसह राज्यातील दुकाने राज्य सरकारचे आदेश मिळत नाहीत तोपर्यंत बंदच राहतील असे, रिटेल ट्रेडर्स असोशिएशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय गृहखात्याने अत्यावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने खुली करण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारने त्यावरील भूमिका स्पष्ट न केल्यामुळे राज्यातील दुकाने पुढील आदेश येत नाही तोपर्यंत सुरु न करण्याची भूमिका रिटेल ट्रेडर्स असोशिएशनने घेतली आहे.

दरम्यान, ३० दिवसांच्या लॉकडाऊननंतर केंद्रीय गृहखात्याच्या आदेशाने आज दुकाने उघडी होत असली तरी दारूची दुकाने खुली होणार नाहीत, असे केंद्रीय गृहखात्याने स्पष्ट केले आहे. ग्रामीण भागातील सर्व प्रकारची दुकाने आजपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर शहरी भागात मॉल वगळता सर्व दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

लॉकडाऊनमध्ये आत्तापर्यंत केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकाने खुली होती. पण आता इतर दुकानेही खुली करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पण मॉल्स आणि मल्टीब्रँड्स अजूनही बंदच राहणार आहेत. पण ही अन्य दुकाने सुरू करण्यासाठी केंद्राने कठोर नियम लागू केले आहेत.

Leave a Comment