लॉकडाऊन हटला नाही तर मे अखेरपर्यंत देशातील 4 कोटी लोकांचे मोबाईल हँडसेट निरुपयोगी


नवी दिल्ली : मोबाईल हा सध्याच्या घडीला लोकांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. पण हा मोबाईल खरच जीवनावश्यक आहे का यावर अनेकांची मते वेगवेगळी असू शकतात. पण आता त्यातच इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन अर्थात आयसीईए या संस्थेनं आपल्या अहवालात सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये मोबाईल शॉपवरची बंधने हटली नाही, तर येत्या मे महिन्याच्या अखेरीस देशातील 4 कोटी लोकांसाठी त्यांचे मोबाईल निरुपयोगी होतील, असा दावा केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन सुरु असल्यामुळे मोबाईल विक्री आणि दुरुस्तीच्या दुकानांवर निर्बंध असल्यामुळे ही स्थिती ओढवू शकते असा दावा करण्यात आला आहे. देशातील बहुतांश लोक सध्या वर्क फ्रॉम होम करत असल्यामुळे लॅपटॉप, इंटरनेट आधी सुविधांबाबतच्या उपकरणांना लॉकडाऊनमध्ये सवलत देण्यात आली आहे. पण ही सूट मोबाईलला देण्यात आलेली नाही. मोबाईल सप्लाय चेनवरची ही बंधने हटवण्यात यावीत यासाठी आपण पंतप्रधानांना विनंती केल्याचेही आयसीईएचे अध्यक्ष पंकज महिंद्रू यांनी म्हटले आहे. सध्या देशात अडीच कोटी हँडसेट हे आवश्यक सेवा मिळत नसल्याने बंद असल्याचा अंदाज या संस्थेच्या अभ्यासात काढण्यात आला आहे.

देशातील 85 कोटी लोक मोबाईल वापरतात. त्यातच दर महिन्याला अडीच कोटी मोबाईलची विक्री होती. यात फोन जुना झाल्याने अपग्रेडेड हँडसेट घेणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. सध्या देशात 2.5 कोटी मोबाईल हे योग्य सेवा न मिळाल्याने निरुपयोगी झाल्याचा आयसीईएचा दावा आहे आणि देशात मे पर्यंत लॉकडाऊनची स्थिती कायम राहिल्यास 4 कोटी लोकांचे हँडसेट निरुपयोगी होतील, असा दावा देखील केला आहे.

Leave a Comment