केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय ; मॉल्स वगळता इतर दुकानदारांना लॉकडाऊनमधून सवलत


नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशभरातील लॉकडाऊनच्या नियमावलीत अजून शिथिलता दिली असून त्यानुसार मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकाने सुरु करण्याची सवलत देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमधून मॉल्स वगळता इतर दुकानदारांना सवलत दिली असली तरी काही अटी देखील ही सवलत देताना घातल्या आहेत. मास्क बंधनकारक, 50 टक्के कर्मचारी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या अटींसह दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे हॉटस्पॉट किंवा कंटेनमेंट झोनमध्ये या सवलती लागू नसणार आहेत. फक्त अत्यावश्यक सेवेची दुकाने म्हणजे अन्न धान्य, मेडिकल्स, दूध, भाजीपाला आतापर्यंत सुरू होती. त्यात आता बदल करुन इतर दुकाने सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. पण हे करताना सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्क घालणे बंधनकारक आणि दुकानांमध्ये 50 टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती असावी, अशी अट घालण्यात आली आहे. मोठी दुकाने तसेच विविध ब्रँडची मॉलसारखी दुकानांना ही सवलत नसणार आहे. केंद्राच्या आदेशानंतर राज्य सरकार आता त्यांचा अध्यादेश काढणार आहे. त्यानुसार राज्यात कोणती दुकान सुरू होतील आणि कुठे ते स्पष्ट होईल.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. देशात या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी हॉटस्पॉट तसेच कोरोना बाधितांच्या संख्येनुसार झोन तयार करण्यात आले आहेत. देशभरात साथरोग अधिनियम कायदा 1897 लागू करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक रोखण्यासासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी व तत्सम अधिकार्‍यांना विशेषाधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.

कोरोनाबाबत खबरदारीचा उपाय म्हणून सगळीकडे अत्यावश्यक सेवेची दुकान म्हणजे अन्न धान्य, मेडिकल्स, दूध, भाजीपाला वगळता मॉल्स, व्यायामशाळा, चित्रपट आणि नाट्यगृहे, जलतरण तलाव आणि अन्य प्रकारची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकाने सुरु करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सवलत देण्यात आली आहे.

Leave a Comment