देशातील 78 जिल्ह्यांमध्ये मागील 14 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण नाही


नवी दिल्ली : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या 24 तासात 1409 ने वाढ झाली आहे, तर कोरोनाचे 388 रुग्ण बरेही झाले आहेत. तर कोरोनाचे जवळपास 19 टक्के रुग्ण बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज नियमित पत्रकार परिषदेत दिली.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशभरातील 21 हजार 393 जणांना कोरोनाची लागण झाली असून कोरोनामुळे आतापर्यंत 681 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 16 हजार 454 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 4257 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 14 दिवसात देशातील 78 जिल्ह्यांमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. तर तब्बल 12 जिल्ह्यात गेल्या 28 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही, मागील आठवड्यात हा आकडा 4 होता. देशात लॉकडाऊन जाहीर होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. या महिन्याभरात देशात कोरोनाच्या जवळपास पाच लाख टेस्ट करण्यात आल्या आहेत. सध्या जास्तीत जास्त टेस्ट करण्यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत केलेल्या पाच लाख टेस्टमध्ये जवळपास 21 हजार लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. यादरम्यान कोरोना व्हायरसचा ट्रान्समिशन आणि डबलिंग रेट कमी करण्यात शासनाला यश आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

कुणावरही रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येऊन नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण हे तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा सोशल डिस्टन्सिंगचे पालन लोक करतील. पण योग्य ती काळजी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची घेतली जात आहे. आज देशातील 736 रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णावर उपचार केले जात आहे. या रुग्णालयामध्ये एकूण 1 लाख 94 हजार बेड्सची व्यवस्था आहे.

Leave a Comment