नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या उपाययोजनांचे जगातील प्रसिद्ध उद्योजक आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी कौतुक केले आहे. नरेंद्र मोदींना बिल गेट्स यांनी एक पत्र लिहिले आहे. त्यांनी याच पत्रातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बिल गेट्स यासंदर्भात म्हणाले की, वेळीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या उपाययोजना आणि कठोर निर्णयांमुळेच भारतातील कोरोनाचे संक्रमणातील दरात घट दिसत आहे, जे संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे.
आपल्या पत्रामध्ये बिल गेट्स यांनी म्हटले आहे की, तुमचे नेतृत्व आणि तुमच्या व सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचे आम्ही कौतुक करतो. भारतावरील कोरोनाचा प्रादूर्भाव ज्यांमुळे कमी आहे. आपल्या पत्रात बिल गेट्स यांनी पुढे लिहिले आहे की, तुमच्या शासनाच्या वतीने लॉकडाऊनचा निर्णय घेणे, क्वॉरन्टाईन करणे, आयसोलेशनसाठी हॉटस्पॉटची ओळख करण्यासाठी चाचण्या वाढवणे, आरोग्य यंत्रणा मजबुतीसाठी प्रयत्न करणे खरच कौतुकास्पद आहे. याव्यतिरिक्त आरोग्य यंत्रणा मजबुतीसाठीही अनेक महत्त्वाचे निर्णय घेणे आणि डिजिटलायजेशनला प्रोत्साहन देणे देखील कौतुकास्पद आहे.
बिल गेट्स पुढे म्हणाले की, मला, खरच आनंद आहे की, तुमचे सरकार कोरोनाशी लढण्यासाठी आपल्या असाधारण डिजिटल क्षमतांचा पूर्णपणे उपयोग करत आहे. आपल्या सरकारने कोरोना व्हायरस ट्रॅकिंग, संपर्क ट्रेसिंग आणि लोकांना आरोग्य सेवांशी जोडण्यासाठी आरोग्य सेतू डिजिटल अॅप लॉन्च करणे एक उत्तम निर्णय आहे.