उत्तर प्रदेशच्या अलीगढ येथील भुजपूरा येथे लॉकडाऊनच्या काळातील वेळ पुर्ण झाल्यानंतर बाजार बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर जमावाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. जमावाने केलेल्या दगडफेकीत एक कर्मचारी जखमी झाला आहे.
या घटनेची सुचना मिळताच अनेक पोलीस स्टेशनची फोर्स आणि पीएस दल घटनास्थळी दाखल झाले व स्थितीला नियंत्रित केले.
अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, सीओ विशाल पांडे यांनी सांगितले की लॉकडाऊनमधील वेळ पुर्ण झाल्यानंतर भाजी विक्रेते घरी जात होते. याच वेळी त्यांच्यामध्ये कोणत्यातरी कारणामुळे वाद सुरू झाला. लॉकडाऊनचे पालन आणि बाजार बंद करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी भाजी विक्रेत्यांच्या भांडणात हस्तक्षेप केला. यावेळी भाजी विक्रेते आणि जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली.
सध्या स्थिती नियंत्रणात असून, जुनैद नावाचे कर्मचारी यात जखमी झाले आहेत. पोलीस या घटनेतील आरोपींना अटक करत आहे.
सध्या लॉकडाऊनच्या पालन करण्यासाठी अलीगढ शहराची 5 झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. याशिवाय वाहनांसाठी दिल्लीप्रमाणे ऑड-ईव्हनची व्यवस्था आहे.