सांगलीकरांनी जिंकली कोरोनाविरोधातील लढाई! जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही


सांगली : सांगलीकरांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली असून आजमितीस सांगलीतील कोरोनाग्रस्तांची संख्या शून्य झाली आहे. इस्लामपूरमधील त्या 26 व्या महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे सध्याच्या घडीला जिल्ह्यात 26 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहरातील कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कातील 15 जणांचे अहवाल सुद्धा निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे. त्यामुळे नांदेडनंतर आता सांगली कोरोनामुक्त झाला आहे. अचानक कोरोना बाधितांची सांगलीतील संख्या वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वेळीच हालचाली करत प्रशासनाला सूचना दिल्या होत्या.

सांगलीतील कोरोनाग्रस्त व काल रविवारी मृत्यू पावलेल्या रूग्णाशी संबंधित एकूण 16 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये सदर रूग्णाच्या कुटुंबातील 5 व्यक्ती होत्या. यापैकी आई, वडील, भाऊ व पत्नी, मुलगा यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. कोरोनाग्रस्त आणि मयत सदर व्यक्तीशी संबंधित संपर्क बाधित अन्य 11 जण इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये होते. त्यांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप आणखी 15 जणांचे रिपोर्ट येणे बाकी असून त्यांचे जर रिपोर्ट निगेटिव्ह आले तर सांगली शहरावर आणि जिल्ह्यावरचा मोठा धोका टळला असे म्हणता येईल.

तर मिरज येथील आयसोलेशन कक्षात इस्लामपूरमधील कोरोनाग्रस्त कुटुंबाशी संबंधित महिला उपचार घेत होती. सदर महिलेचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरानाची लागण झालेल्या 27 रूग्णांपैकी 26 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. सांगलीच्या इस्लामपूर येथील सौदी अरेबियातून परतलेल्या चौघेजण यांच्यामुळे 26 जणांना कोरोना लागण झाली होती. तर 25 जण काही दिवसांपूर्वी कोरोना मुक्त झाले होते, तर एक महिला बाधित होती. काल सोमवारी या 26 व्या महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे इस्लामपूरच्या कोरोना रुग्णांची आणि सांगली जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता शून्य झाली आहे. मात्र, तरीही प्रशासनाकडून सर्व पातळीवर खबरदारी घेण्यात येत आहेत.

Leave a Comment