20 एप्रिलपासून पुन्हा सुरु होणार टोल वसुली


नवी दिल्ली : देशातील लॉकडाऊनची 3 मे पर्यंत मुदतवाढीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून पहिल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले होते. देशभरातील टोल देखील यामध्ये बंद केले होते. पण आता 20 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोलनाक्यांवर टोल वसुली चालू होणार आहे. याबाबतचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जारी करण्यात आले आहेत. प्राधिकरणाने हे आदेश काल, 17 एप्रिल रोजी जारी केले असून या आदेशानुसार आता देशभरातील टोलनाक्यांवर खासगी तसेच व्यावसायिक वाहनांकडून टोलवसुली सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

20 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरीलसर्व टोलनाक्यांवरील टोल वसूली सुरु झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ( MSRDC) देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) पावलावर पाऊल टाकत राज्यातील टोलवरील वसुली सुरु केली जाण्याची शक्यता आहे.

देशातील अनेक सेवा कोरोना विषाणु आणि देशभरात लागु करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आल्या आहेत. पण देशभरात कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणी 20 एप्रिलपासून सवलत मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील तसेच देशातील काही भागांमध्ये अटी शर्तींच्या अधीन राहून काही उद्योगधंद्यांना काम सुरु करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या अत्यावश्यक तसेच इतर काही वस्तुंची देखील ने-आण करण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सहाजिकच मोठ्या प्रमाणात व्यावसायिक तसेच खासगी वाहने रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. यामुळे 20 एप्रिलपासून सर्वांना प्रवास करताना टोल सुरु केला जाणार आहे.

Leave a Comment