देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १४ हजाराच्या पुढे, तर ४८० जणांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १४ हजार ३७८ वर पोहोचला असून मृतांची संख्या ४८० वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान २२ लाख ३१ हजार ४३८ वर जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन हजारांच्या पुढे गेली असून हा टप्पा गाठणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजार ३२० एवढी झाली आहे. राज्यात शुक्रवारी १८ नवे रुग्ण आढळले. तर दिवसभरात ७ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ३३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ज्या सात रुग्णांचा शुक्रवारी मृत्यू झाला त्यातील पाचजण मुंबईचे तर दोघेजण पुण्यातील होते.

आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी माहिती देताना सांगितले होते की, कोरोनाग्रस्तांच्या वाढीत घट झाली आहे. टाळेबंदीपूर्वी दर तीन दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट होत होती. गेल्या सात दिवसांमधील आकडेवारीनुसार हे प्रमाण आता ६.२ दिवसांवर आले आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के तर मृत्यूचे प्रमाण २० टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी दिली.

१९ राज्यांमध्ये हे प्रमाण रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी असल्याचे आढळले आहे. पण त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही. पण दिल्ली, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पंजाब या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राप्रमाणे या सर्व राज्यांमध्येही कोरोनाचे रुग्ण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. नव्या रुग्णांचे प्रमाण ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. ताप आलेल्या व्यक्ती तसेच, फुप्फुसाशी निगडीत आजार असलेल्या व्यक्तींच्या नमुना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

Leave a Comment