देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १४ हजारांच्याही पुढे, २४ तासात ४३ जणांचा मृत्यू


नवी दिल्ली – मागील चोवीस तासात देशभरात ९९१ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १४ हजार ३७८ झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे कालपासून आजपर्यंत ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत देशभरात कोरोनाची लागण होऊन ४८० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. देशभरातील १९९२ रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली आहे.

दरम्यान दुसरीकडे देशात कोरोना ग्रस्तांची वाढ मंदावली असल्याची माहिती काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती. रुग्णसंख्या टाळेबंदीपूर्वी दर तीन दिवसांनी दुप्पट होत होती. मागील सात दिवसांमधील आकडेवारीनुसार हे प्रमाण आता ६.२ दिवसांवर आले असल्याचे सांगण्यात आले होते. रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा १९ राज्यांमध्ये हे प्रमाण कमी असल्याचे आढळले आहे. त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही. पण दिल्ली, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पंजाब या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राप्रमाणे या सर्व राज्यांमध्येही कोरोनाचे रुग्ण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असून नव्या रुग्णांचे प्रमाण ४० टक्क्यांनी कमी झाल्याचे सांगण्यात आले होते. ताप आलेल्या व्यक्ती तसेच, फुप्फुसाशी निगडीत आजार असलेल्या व्यक्तींच्या नमुना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत झाल्याची माहिती काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती.

Leave a Comment