…तर पुण्यातील भांडकुदळ नवऱ्यांना करणार क्वारंटाइन


पुणे : देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता नरेंद्र मोदींनी 3 मेपर्यंत तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. त्याचबरोबर कोरोनाचा जास्त प्रसार होऊ नये म्हणून कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ‘स्टे होम’ चा पर्याय निवडण्यात आला आहे. पण, २१ दिवस एकत्र राहिल्यानंतर घरात वाद होत असल्याच्या घटना पुढे येऊ लागल्या आहेत. नवरा-बायकोमधील हा वाद आता विकोपाला जावू लागल्यामुळे पुणे जिल्हा प्रशासनाने सगळ्याच नवरोबांना तंबी दिली आहे. भांडकुदळ नवऱ्यांना आता क्वारंटाइन करण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला असून तसे लेखी आदेश जारी केले आहेत.

सध्या पुणे जिल्ह्यातील लॉकडाऊनमुळे विविध गावांमधील अनेक घरांमध्ये नवरा-बायकोच्या कुरबुरींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहेत. तशा तक्रारीत वाढ झाल्यामुळे यावर उपाय म्हणून पुण्यातील भांडखोर नवऱ्यांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या कुरबुरी थांबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामस्तरावर महिला दक्षता समिती स्थापन केली जाणार आहे.

पुणे जिल्ह्यात ग्रामीणस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या समिती माध्यमातून समुपदेशन करण्यात येणार आहे. यावेळी भांडखोर नवरोबांना समज देणार आहे. पण तरीही भांडखोरपणा कायम ठेवणाऱ्या नवरोबांना पोलिसांच्या मदतीने थेट संस्थात्मक क्वारंटाइन करणार आहे. तसे जिल्हा प्रशासनाने आदेश जारी केले आहेत. दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबतचे लेखी आदेशच काढले आहेत.

Leave a Comment