आता यंदाची आयपीएल विसरा, सौरव गांगुलीचे संकेत


नवी दिल्ली – सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगभरासह भारतात भीषण वातावरण आहे. देशातील महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक दिवशी कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. बीसीसीआयने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. पण ३० एप्रिलपर्यंत देशातील काही राज्यांनी लॉकडाउन वाढवल्यामुळे यंदाच्या हंगामातील आयपीएलवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यंदाच्या हंगामातील आयपीएल स्पर्धा रद्द होणार नाही असे बीसीसीआयचे काही अधिकारी सांगत असले तरीही बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सध्याच्या घडीला आयपीएल स्पर्धा खेळवणे शक्य नसल्याचे सूचक संकेत दिले आहेत.

आम्ही सध्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत, पण सांगण्यासारखे आता काहीच नाही आणि सांगण्यासारखे आहे तरी काय? विमानतळे बंद आहेत, लोक घरात अडकले आहेत, ऑफिस बंद आहेत, कोणीही कुठेही जाऊ शकत नाही. सध्याची परिस्थिती पाहता मे महिन्याच्या मध्यापर्यंत अशीच परिस्थिती राहिल,असा अंदाज आहे. खेळाडूंना तुम्ही कुठून आणणार? ते प्रवास कसा करतील? जगभरात सध्या कोणतीही क्रीडा स्पर्धा खेळवली जाईल अशी परिस्थिती नाही, आयपीएल तर विसरुनच जा, अशी माहिती गांगुलीने द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तसमुहाला दिली.

लॉकडाउनसंदर्भात केंद्र सरकारकडून अधिकृत माहिती येईपर्यंत आयपीएलबद्दल आता काहीही सांगणे शक्य होणार नसल्याचेही गांगुलीने स्पष्ट केले. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबत सोमवारी मी बोलल्यानंतर तुम्हाला अधिक माहिती देऊ शकेन. पण अगदी मनापासून सांगायला गेले तर कोरोनामुळे सध्या संपूर्ण जग ठप्प झालेले आहे, अशा परिस्थितीत खेळाचे भविष्य काय असेल हा प्रश्नच आहे. देशभरात प्रत्येक दिवशी कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असून आतापर्यंत १५० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Leave a Comment