नवी दिल्लीः जीवघेण्या कोरोना व्हायरसने देशात हाहाकार माजवला असून, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाला रोखण्यासाठी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्याच पार्श्वभूमावर आज पंतप्रधान मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी एक ट्विट केले आहे. लॉकडाऊन वाढवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला निर्णय योग्य असून आज देशाची परिस्थिती इतर विकसित देशांपेक्षा चांगली आहे. कारण आधीच आपण लॉकडाऊन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाऊन आता जर संपवले, तर आपण केलेल्या सर्वच प्रयत्नांवर पाणी पडेल. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय गरजेचा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशभरातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवले, जावे असा सल्ला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला होता. तसेच काही ठराविक राज्यांमध्ये लॉकडाऊन न वाढवता, संपूर्ण देशभरात लॉकडाऊन वाढवला गेला पाहिजे, असे मत केजरीवालांनी मांडले होते. संपूर्ण देशात लॉकडाऊन वाढवला पाहिजे. लॉकडाऊन एखाद्या राज्यातून हटवणे आणि एखाद्या राज्यात सुरू ठेवणे योग्य नसल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.