लॉकडाउन तोडण्यात पुणेकरांनी मारली बाजी


पुणे – जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोना व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चीनमधून पसरण्यास सुरुवात झालेल्या या व्हायरसने इतर देशात शिरकाव केल्यानंतर त्या देशांमध्येही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आपल्या देशात आणि खासकरुन महाराष्ट्रातील स्थितीही चिंताजनक आहे. राज्यातील आणि देशातील अनेक शहरे सध्या कम्युनिटी ट्रान्समिशनच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचली आहेत. पण अशा गंभीर परिस्थितीतही लॉकडाउन भंग केल्याच्या घटना वारंवार ऐकण्यात येत आहेत. २२ मार्च पासून महाराष्ट्रात लॉकडाउन लागू झाल्यानंतर २७,४३२ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, यात पुणेकरांनी बाजी मारली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने २२ मार्च रोजी देशात लॉकडाउनची घोषणा केली होती. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू असणार आहे. दरम्यान, लॉकडाउनचे २२ पासून ते ०८ मार्चपर्यंत राज्यातील अनेक ठिकाणी उल्लंघन करण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबत महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार बुधवारपर्यंत २७,४३२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हे गुन्हे भादंवि कलम १८८नुसार दाखल करण्यात आले आहेत. यात विशेष म्हणजे लॉकडाउनच्या काळात शहरी भागातील लोक बाहेर पडत असल्याने सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद पुण्यात झाली आहे. पुणे पोलिसांनी ३ हजार २५५ लोकांवर विनाकारण बाहेर फिरत असल्यामुळे गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर अहमदनगर २ हजार ४४९, नागपूर १९९९, पिंपरी-चिंचवड १९९३, मुंबई १६७९ आणि नाशिक १६४८ असे गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

पोलिसांनी मागील तीन आठवड्यात १ हजार ८८६ लोकांना अटक केली आहे. यात होम क्वारंटाइनच्या आदेशाचा भंग करणाऱ्या ४३८ लोकांचा समावेश आहे. तर पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी ६० जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर रस्त्यावर फिरणाऱ्या १२, ४२० गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Leave a Comment