कोरोनाविरोधातील लढाईसाठी निधी जमवण्यासाठी खेळवा भारत-पाक मालिका


मुंबई : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने कोरोनाविरोधातील लढाईसाठी निधी जमवण्याच्या उद्देशाने भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मालिका खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. शोएब अख्तरने दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळवण्यात यावी, असे म्हटले आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेने मुंबईवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये एकही क्रिकेट मालिका झालेली नाही. आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्येच दोन्ही देशांचा सामना झाला आहे.

शोएब अख्तर म्हणाला की, दोन्ही देशांमध्ये संकटाच्या काळात तीन सामन्यांच्या मालिकेचा प्रस्ताव ठेवतो. या मालिकेचा निकाल काहीही आला तरी पहिल्यांदाच दोन्ही देशांपैकी कोणत्याही क्रिकेटप्रेमींना दु:ख होणार नाही. विराट कोहलीने शतक ठोकले तर आम्ही खुश होऊ. बाबर आजमने शतक केले तर तुम्ही आनंदी व्हा. सामन्याचा निकाल काहीही आला तरी दोन्ही संघ विजयी होतील. यामुळे दोन्ही देशांचे राजकीय संबंधही सुधारतील.

दोन्ही देशांनी या संकटाच्या काळात एकमेकांची मदत करायला हवी. जर भारताने आम्हाला दहा हजार व्हेंटिलेटर दिले तर पाकिस्तान ही गोष्ट कायम लक्षात ठेवेल. आम्ही केवळ सामन्यांचा प्रस्ताव ठेवू शकतो. निर्णय अधिकाऱ्यांना घ्यायचा असल्याचेही शोएब अख्तर म्हणाला.

याआधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या ट्रस्टला मदतीचे आवाहन करणारे भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंह आणि हरभजन सिंह यांच्यावर जोरदार टीका झाली होती. शोएब अख्तर याबाबत म्हणाला की, हे अमानवी असून सध्याच्या परिस्थितीत देश किंवा धर्माची नाही तर मानवतेची चर्चा व्हायला हवी.

Leave a Comment