मुंबईत एकाच दिवसात सापडले तब्बल 117 नवे कोरोनाग्रस्त


मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव राज्यात आता वेगाने वाढत असल्याचे चित्र दिसत असून राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा मंगळवारी हजारच्या पार गेला असून काल एकाच दिवसात तब्बल 117 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. परिणामी राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 1135 झाला आहे. तर 120 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. दरम्यान, पुण्यात मागील 24 तासात शहरात आठ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. पुण्यात एकूण मृतांचा आकडा 16 वर गेला आहे. अद्याप राज्यात तिसऱ्या स्टेजचा संसर्ग सुरु झाला नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वेगाने होत आहे. कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या मागील आठवड्यात वाढली आहे. यात मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 500 च्या वर गेली आहे. त्याखालोखाल पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. मुंबई आणि पुणे शहरात काही ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाच्या दृष्टीने संवेदनशील असलेले भाग आता सील करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचे रुग्ण ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. अशी ठिकाणे आता प्रशासनाकडून सील करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे कोरोना संसर्गाची तिसरी स्टेज राज्यात सुरु झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. जरी वेगाने राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी ही तिसरी स्टेज नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. पहिल्या स्टेजमध्ये बाहेरुन आलेले लोक कोरोना पॉझिटिव्ह असतात. तर, दुसऱ्या स्टेजमध्ये बाहेरुन आलेल्या लोकांमुळे स्थानिकांना याची लागण होण्यास सुरुवात होते. तर, तिसऱ्या स्टेजमध्ये कोरोनाची लागण कम्युनिटीमध्ये पसरते, असे ह्या संसर्गाचे प्रकार समजले जातात.

कोरोनाचा प्रसार वेगाने होऊ नये यासाठी प्रशासनाकडून वारंवार सोशल डिस्टन्स पाळण्यास सांगितले जात आहे. पण तरीही लोक विनाकारण रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. भाजी मंडई असेल किंवा अन्य ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळण्यास सांगितले जात आहे. पण याचे अनुकरण करताना काही लोक अद्यापही दिसत नाही. त्यामुळे परिणामी आम्हाला कठोर व्हावे लागेल, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment