माहिती लपवल्याप्रकरणी १५० तबलिग्यांविरोधात मुंबई पोलिसांकडून गुन्हे दाखल


मुंबई : राज्यावर ओढावलेले कोरोना व्हायरसचे संकट वाढतच चालले असून कोरोनाचा प्रादुर्भाव शहरापासून गावापर्यंत आणि आता तर झोपडपट्टीतही झाला आहे. त्यातच दिल्लीतील निजामुद्दीन येथे पार पडलेल्या धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्यांकडून राज्यातील अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. असे असताना कार्यक्रमाला गेलेल्या लोकांनी स्वतःहून पुढे येऊन माहिती देण्याची गरज होती. पण त्यांनी असे न करता आपली माहिती लपवल्यामुळे याप्रकरणी १५० जणांवर मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तबलिगी धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांनी माहिती न लपविता समोर येऊन महानगरपालिकेला हेल्पलाईन आधारे कळविण्याचे आवाहन करण्यात आले होते. अन्यथा वेगवेगळ्या कलमांतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला होता. तरीही अनेकांनी आपली माहिती लपवल्याचे पुढे आले आहे. दिल्लीत धार्मिक कार्यक्रमला जाऊन कोरोना सारख्या भयानक साथीचा रोग पसरवायला मदत केल्याबद्दल, तसेच माहिती लपवल्याबद्दल महापालिकेच्यावतीने अग्निशमन दलाने हा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार १५० जणांविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, दिल्लीमधील आयोजित तबलिगी मरकजचा भाग असलेल्या सर्वांनी मुंबई महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांक १९१६ वर प्रवासाची तपशीलवार माहिती द्यावी अशी विनंती मुंबई पोलिसांनी केली आहे. असे न केल्यास आयपीसी, आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग कायद्यातंर्गत कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले होते. दरम्यान, राज्यातील १४०० लोक दिल्लीतील या कार्यक्रमाला गेले होते. त्यापैकी ५० जणांनी मोबाइल बंद ठेवल्याने त्यांच्याशी अजूनही संपर्क झाला नसल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या लोकांनी स्वतःहून प्रशासनाशी संपर्क साधावा अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Leave a Comment