देशातील कोरोना बाधितांची संख्या 4000 पार


नवी दिल्ली : कोरोनाच्या हाहाकारापुढे जगभरातील बहुतांश देश हतबल झाले असून कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या देशातही फोफावत आहे. राजस्थान, गुजरातमध्ये रविवारी प्रत्येकी एक-एक, महाराष्ट्रात तीन आणि तामिळनाडूमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच आंध्रप्रदेशमध्ये 34, महाराष्ट्रात 26, राजस्थानमध्ये सहा, गुजरातमध्ये 14, मध्यप्रदेशमध्ये 12 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून कोरोना बाधितांचा एकूण आकडा 4067 वर पोहोचला आहे. तर या व्हायरसमुळे देशात आतापर्यंत 83 लोकांचा मृत्यू झाला आहे.

यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 4067 कोरोना बाधितांपैकी 291 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. रविवारी देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचे 58 नवीन रूग्ण आढळून आले. राज्यामध्ये आतापर्यंत संख्या 500 पार पोहोचली आहे. तर फक्त दिल्लीमध्ये 320 कोरोना बाधित आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत सर्वाधिक 24 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुजरातमध्ये 11, तेलंगणामध्ये 7, मध्यप्रदेशमध्ये 9, दिल्लीमध्ये 7, पंजाबमध्ये 5, कर्नाटकात 4, पश्चिम बंगालमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि केरळमध्ये प्रत्येकी दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये तीन, आंध्रप्रदेश, बिहार आणि हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

जर कोरोनाची बाधा तबलिगी जमातीतील लोकांना झाली नसती तर देशात कोरोनाची परिस्थिती अत्यंत वेगळी असती. फक्त तबलिगींमुळे 21 राज्यांत एकूण 1095 कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत. आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, आतापर्यंत देशात 274 जिल्हे कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत.

मरकज प्रकरण झाले नसते तर भारताचा कोरोना संसर्ग दर अत्यंत कमी असता, असे आरोग्य मंत्रालयाचे सचिव अग्रवाल यांनी सांगितले. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, कोरोनाचे रूग्ण सध्याच्या स्थितीत दिवसाला सरासरी 4.1 असे दुप्पटीने वाढत आहेत.

Leave a Comment