मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचले पाहिजे – राज ठाकरे


मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीमधील निझामुद्दीन येथील तबलिगी मरकजच्या कार्यक्रमावर बोलताना संताप व्यक्त केला आहे. मरकजच्या सदस्यांकडून रुग्णालयात डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या काळात कुणाला मतदान करावे सांगायला येणारे मुल्ला मौलवी आता कुठे गेले आहेत ? अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली. राज ठाकरे आपल्या कृष्णकुंज निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

निजामुद्दीन येथील तबलिगी मरकजच्या कार्यक्रमावर बोलताना राज ठाकरे यांनी मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे. वेगळा विभाग यांच्यासाठी उभा करावा आणि त्यांचे वैद्यकीय उपचार बंद करायला हवे. या दिवसांमध्येही त्यांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल आणि आम्ही देश संपवू असे कारस्थान करायचे असेल तर यांना वेळीच ठेचले पाहिजे. त्यातील काही महाभाग नोटांना थुंकी लावत आहेत, भाज्यांवर थुंकत आहेत. नर्सेसमोर नग्न फिरत आहेत. या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल व्हायला हवेत तर लोकांना विश्वास बसेल. याबद्दल पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे, असे म्हटले आहे. तसेच धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील अशा काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचले पाहिजे. लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.

राज्यातील लोकांनी हा लॉकडाउन गांभीर्याने घ्यावा. लोकांना रेशन, भाजीचे असे अनेक प्रश्न पडले आहेत. अनेक ठिकाणी सरकार उपलब्ध करुन देत आहे. पण मला भीती एका गोष्टीची आहे ती म्हणजे जर लॉक़डाउन वाढवला तर त्याचे गंभीर परिणाम होतील. कोणताही कर सरकारकडे येणार नाही. उद्योगधंद्यावर परिणाम होतील. आधीच ५० टक्क्यांवर पगार आणले आहेत. जितके दिवस वाढवू तसा परिणाम होत जाणार. शिस्त पाळली जाणार नाही तर अर्थसंकट निर्माण होईल. मोदी यावर काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, लॉकडाउन जे पाळत आहेत त्यांच्या मनात भीती आहे. नोकरी राहणार का ? उद्या भाजीपाला मिळणार का ? असे प्रश्न त्यांना सतावत आहेत. शिस्त जे पाळत नाही आहेत त्यांच्यामुळे हे घडत आहे. ज्या बातम्या व्हॉट्सअप, चॅनेलवर येत आहेत ते पाहूनच धक्का बसतो. आजकाल प्रत्येक घरी एक डॉक्टर झाला आहे. कोणी म्हणते गोमूत्र प्या, लसूण खा, कांदा खा, डॉक्टर काय उगाच मेहनत करत नाही आहेत. जीव धोक्यात घालून ते काम करत आहेत.

आपला जीव धोक्यात घालून सर्व डॉक्टर, शेतकरी, पोलीस, वीज-पाणी पुरवठा करणारे कर्मचारी काम करत आहे. पण त्याचे गांभीर्य लोकांना कळत नाही. याकडे लक्ष दिले पाहिजे. त्या दिवशी मी पंतप्रधानांचे भाषण ऐकले. आता खरे तर वैद्यकीय यंत्रणा कशा पद्धतीने राबवली जात आहे. मृतांचा नेमकी संख्या काय आहे ? खरच किती रुग्ण आहेत ? याबाबत संभ्रमावस्था आहे. ती दूर करण्याची जबाबदारी त्या पदावर बसलेल्या व्यक्तीची असते. त्यांनी ती संपवायची असते, असे राज ठाकरेंनी म्हटले.

5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता पंतप्रधानांनी दिवे लावण्यास सांगितले आहे. लोक काळोख करतीलही, नाही तरी घरात बसून काय करायचे आहे. श्रद्धा किंवा अंधश्रद्धेचा विषय असेल, पण त्याच्याने काही होणार असेल तर त्याने परिणाम होऊ देत. पण नुसते दिवे घालवून, मेणबत्त्या पेटवून, टॉर्च लावून याऐवजी पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण जरी दिसला असता तरी लोकांना समाधान वाटले असते. देश म्हणून आपण कुठे चाललो आहेत, पुढे काय घडणार आहे लोकांना कळले असते. उद्योगधंद्यांना काही दिलासा दिला नाही. तर उद्या नोकऱ्यांवर परिणाम होईल, असे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.

आजपर्यंत कोणाच्या आयुष्यात असा प्रसंग आला नव्हता. मी देखील असे कधी बघितले नव्हते. एखाद्या देशात एखादी घटना घडते हे आपण पाहिले आहे. पण जगभर एकच गोष्ट घडत असल्याचे कोणी पाहिलेले नाही. मी इतकी शांतता मुंबईच्या दंगलीतही पाहिली नव्हती. लोक जर अशा प्रकारे वागत राहिले आणि कोरोनाचे रुग्ण वाढत राहिले तर लॉकडाउन वाढवावाच लागेल. १४ तारखेपर्यंत सर्व सुरळीत होईल, असे मला वाटत नाही. सगळे घऱात थांबले तरच वैद्यकीय कर्मचारी, महापालिका कर्मचाऱ्यांना माहिती मिळण्यात मदत होईल. ते काय जेलमध्ये टाकणार नाही आहेत. इतरांना त्रास होऊ नये यासाठी लोकांनी पुढे यायला पाहिजे. यामध्ये लपवण्यासारखे काही नाही. मला वाटते समाजावर सर्वात मोठी जबाबदारी आहे. नुसते सुशिक्षित असून चालत नाही, सुज्ञ पण असावे लागते, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी भाजी मार्केटमध्ये होणाऱ्या गर्दीवर बोलताना त्याची योग्य व्यवस्था केली पाहिजे असे म्हटले. सरकारवर मला टीका करायची नाही. ती आता योग्य वेळ नाही. परंतु सरकारने ती यंत्रणा लावायला हवी. सरकारने तशी व्यवस्था केली पाहिजे. प्रत्येक विभागवार यंत्रणा राबवली पाहिजे. सरकार करत नाही अशातला भाग नाही, पण ती नीट केली पाहिजे, असे राज ठाकरेंनी सांगितले.

पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर फक्त गुन्हे दाखल करुन चालणार नाही, तर यांना फोडून काढलं पाहिजे. त्याचे व्हिडीओ व्हायरल केले पाहिजेत. एक व्हिडीओ मी पाहिला ज्यामध्ये घरातील लोकांनी मिळून पोलिसांना मारले. भेंडी बाजारामध्ये पोलिसांना शिव्या घातल्या जात असतानाचा एक व्हिडीओ आला. मुख्यमंत्र्यांना मी सांगितले की, यावर कडक पावले उचलावी लागतील. याचा संदेश संपूर्ण समाजभर जाण्याची गरज आहे. हे लपून छपून करण्यासारखे नाही. ज्याप्रकारे ही लोक वागत आहेत त्यांना काय प्रकारची शिक्षा मिळत आहे, हे सर्वांना कळणे गरजेचे असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले.

राज ठाकरे यांनी मुस्लीम समाजातील अनेकांची दिशाभूल केली जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना यांचे मुल्ला मौलवी आता आहेत कुठे ? असा सवाल विचारला. कुणाला मतदान करावे हे सांगायला निवडणुकीच्या वेळी येतात ना, मग आता या मुल्ला मौलवींनी समोर येऊन कसे वागायला हवे ते सांगायला हवे. पण ते आता कुठे आहेत ? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. हे संशय येणारी स्थिती का निर्माण करतात, असे विचारत कारले तुपात घोळवा, साखरेत घोळवा कडू ते कडूच राहते, तसेच आहेत हे अशी टिप्पणीही त्यांनी मुस्लीम धार्मिक गुरूंवर केली.

लॉकडाउनची शिस्त पाळली नाही तर अर्थसंकट निर्माण होईल अशी भीती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. माझी सर्वांना लॉकडाउनची शिस्त पाळा अशी विनंती आहे. यंत्रणेवर ताण आला तर सरकारवर परिणाम होईल. त्यामुळे उद्योगधंद्यावर परिणाम होईल, नोकऱ्या जातील. हे सगळे आपल्या एका चुकीमुळे होणार असल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment